साके-बाचणी, व्हनाळी परिसरात नुकसानग्रस्त पिकांची पहाणी,
हजारो एकरातील भातपिक भुईसपाट
व्हनाळी / वार्ताहर
परतीच्या पावसामुळे यंदा काढणीला आलेल्या भात, सोयाबीन, भू्ईमुग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गतवर्षी महापुरामुळे नदीकाठची हजारो एकरातील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी संकटात सापडला. तसेच परतीच्या पावसामुळे आद्यापही माळराणातील पिके पाण्याखाली आहेत. शिवाय कापणीला आलेल्या पिकांत पाणी तुंबल्यामुळे पिके कुजली आहेत. या आसमानी संकटामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे तेव्हा संबधीत भिगामार्फत आतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी केली. साके (ता.कागल) येथे अतिवृष्टीने भात पिकाच्या झालेल्या नुकसानीच्या पाहणी करतांना ते बोलत होते.
यावेळी साके, बाचणी, व्हनाळी परिसरातील ज्ञानदेव पाटील, मारुती पाटील आदी शेतकऱ्यांच्या भात, सोयाबीन, भुईमूग,झेंडू पिकांच्या नुकसानग्रस्त क्षेत्राची समरजित घाटगे यांनी पहाणी करून शासकीय अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून भरपाईसाठी त्वरीत अहवाल पाठवणे बाबत सूचना दिल्या.
घाटगे पुढे म्हणाले, पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. त्यामुळे बळीराजा आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच घर व इतर मालमत्तांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन पंचनामे युद्धपातळीवर करावेत. या नुकसानग्रस्तांना त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
यावेळी कृषी अधिकारी अरविंद पाटील, विस्ताराधिकारी सुरेश कुंभार, ग्रामसेविका शुभांगी पुरेकर, कृष्णात पाटील, तलाठी सुनील भातमारे, संतोष पवार, दयानंद कांबळे, उत्तम पाटील, प्रताप पाटील, हिंदुराव पाटील, शहाजी पाटील, सुभाष शेंडे, अविनाश पाटील, सुधीर पाटील, दिनकर वाडकर,नामदेव बल्लाळ, आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे प्रश्न शासनाने गांभीर्याने घ्यावेत
गतवर्षीचा महापूर, जागतिक महामारी कोरोनाचे संकट, वीज दरवाढ, कर्जमाफीसह व्याज सवलत मधील घोळ, या संकटाच्या मालिकेत आत्ताच्या अतिवृष्टीची भर पडली आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्याला दसरा- दिवाळीच्या तोंडावर बळीराजा अडचणीत आला आहे शेतकऱ्यांचे प्रश्न शासनाने गांभीर्याने घ्यावेत. असेही घाटगे म्हणाले.
नुकसान लाखात मदत तुटपुंजी
गेल्या दोन वर्षात पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकतसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची गतवर्षी अतिवृष्टीमुळे घरे पडली शेतकऱ्यांना स्थलांतरीत व्हावे लागले. नुकसान लाखात झाले पण शासनाने मदत मात्र तुटपुंजी केली. त्यामुळे शेतकरी नेहमीच अडचणीत सापडूनही शेतक-यांच्या पदरी नेहमी निराशाच असल्याची खंत घाटगे यांनी व्यक्त केली.