वार्ताहर / उञे
पन्हाळा तालुक्यातील उत्रे येथील जागृत देवस्थान हनुमान मंदिरात गेली पंचवीस वर्षे अखंड वीणा पारायण सुरू आहे. पन्हाळाच्या पायथ्याशी कासारी नदीकाठावरिल कोतोली कोल्हापूर मार्गावर अडीच हजार लोकवस्तीचे गाव-गावाची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. पिंडीसारख्या आकाराचा हाटकोबा खडी कडेने गाव वसले आहे. गाव विविध कारणांमुळे चर्चेत असायचे पण सप्टेंबर 1995 मध्ये माचणुर येथील संत बाबा महाराज आरवीकर यांचे शिष्य अनंत स्वामी यांनी व इतर गावकरी यांनी सर्वजण एकत्र करून भक्तिमय वातावरण निर्माण केले. सर्वांनी साथ देत हनुमान मंदिरात अखंड विणापारायण सुरू झाले. मंदिराचा जिर्णोधार विविध शासकीय निधी व लोकसहभागातून भव्य दिव्य मंदिर उभारले आहे. गटतट विसरूण गावात एकोप्याचे वातावरण निर्माण झाले.
गावाने वार्षिक विणापारायण पञक तयार केले आहे. प्रत्येक घराला वर्षातून एक दिवस विणा धरण्याचा मान मिळतो. ज्या दिवशी घरची पाळी असेल त्या दिवशी घरातील महिला, पुरुष, लहान मुले आनंदाने विणा घेतात. सकाळी सात ते दुसरा दिवस सकाळी सातपर्यंत त्या घरात विणा घेतात. या मंदिराचा ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्र म्हणून विकास होत आहे. दररोज पुजा, आरती शनिवारी गावात दिंडीसह भजन रामनवमी हनुमान जयंती, पारायणे, गोकुळ अष्टमी आदींसह विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गावातील लक्ष्मी मंदिर, विठ्ठल मंदिर, मसोबा मंदिर, संत बाबा महाराज मंदिर, महादेव मंदीर, तामजाई, वीर, थळपांठर, हाटकोबा, दत्त आदी देवस्थान असल्याने गावच्या वैभवात भर पडली आहे. वीणा पारायण उपक्रमात परिसरातले अनेक भाविक भक्तिभावाने सहभागी होतात. आध्यात्मिक विचाराला चालना देणारा हा उपक्रम अखंड सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. यासाठी सर्व जण कार्यरत आहेत.