शहरात लसीसाठी केंद्रांवर पहाटेपासून रांगा, सहा तासांनी लस येणार नसल्याचे स्पष्टीकरण, मनःस्तापाने महिलांचा त्रागा, ज्येष्ठांची होलपट,वशिल्याने लस, शिल्लक लस जाते कुठेचा प्रश्न
प्रतिनिधी / कोल्हापूर
शनिवारी लाईनमध्ये थांबूनही पदरी निराशाच.. रविवारी पहाटे केंद्रांवर.. सकाळी नऊपर्यंत लाईनमध्ये प्रतिक्षा.. सहा तासानंतर `आज लस नाही..’ असं सांगणं.. महिलांचा मनःस्ताप अन् चढलेला पारा.. ज्येष्ठांची ससेहोलपट अन् वशिल्याने लसीचा आरोप.. अन् शिल्लक लस जाते कुठे.. हा त्यांचा प्रश्न.. दुसऱया डोससाठी प्रतिक्षेतील लाभार्थ्यांच्या या प्रश्नांवर प्रशासन मौन आहे.
शहर आणि परिसरातील लसीकरण केंद्रांवर शनिवार, रविवारी लस मिळणार नाही, असे स्पष्ट केले होते. तरीही काही केंद्रांवर शंभर ते दीडशे कुपन्स दिली गेली. या कुपन्ससाठी पहाटेपासून रांगेत अनेक जण होते. शनिवारी त्यांना रविवारी या, असे सांगण्यात आले. तरीही काहींनी अन्य केंद्रांवर लसीसाठी चौकशी केली, फेऱयाही मारल्या. काही ठिकाणी जेथे लस घेतलेय, तेथे जा, असे सांगण्यात आले. त्यामुळे शनिवारचा अनुभव लक्षात घेत रविवारी दुसऱया डोससाठी लाभार्थ्यांनी पहाटेपासूनच केंद्रांवर गर्दी केली.
पहाटे चार वाजल्यापासून काहींनी नंबर लावले, सहा वाजल्यानंतर गर्दी वाढली, अन् सकाळी 9 वाजेपर्यत मोठी रांग लागली. केंद्रासमोरील इमारतीत झाडू कामगार आलेले. त्यांच्याकडून कोणीतरी आज लस येणार नसल्याचा निरोप दिला अन् रांगेत सहा तास ठाण मांडून बसलेल्या महिलांचा पारा चढला. त्यांचा मनःस्ताप दिसत होता, पण समोर भांडण्यासाठी कोणीच नाही..अशी स्थिती.. ज्येष्ठांच्या ससेहोलपटीचा हा तिसरा दिवस.. त्यांच्याकडून वशिल्याने लस देत असल्याचा आरोप झालाच..शिवाय शिल्लक लस जाते कुठे.. हा प्रश्नही केला गेला.
शहरातील प्रत्येक केंद्रांवर किती लस येते, त्याचे वाटप किती होते, अन् शिल्लक लस कुठे जाते, ती दुसऱया दिवशी दिली जाते का, हे प्रश्न आहेत. लस केंद्रावर पोहोचेपर्यत किती डोस मिळणार याची माहिती तेथील कर्मचाऱयांना नसते. पण 100 ते 150 कुपन्स वाटली जातात. त्यामुळे दुसऱया डोससाठी सकाळपासून रांगेत थांबलेल्यांना लस मिळते, त्यानंतरच्या लाभार्थ्यांचे काय, ते पुन्हा दुसऱया दिवशी रांगेत असतात. अशावेळी दोन दिवस जर लसीकरण होणार नसेल, तर यासंदर्भातील फलक आधीच लावले जाण्याची गरज आहे. पण त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने लाभार्थ्यांना मनःस्ताप सोसावा लागत आहे.