कचरा घरातच कुजत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
वार्ताहर / पाचगाव
पाचगाव ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या खरेदी केल्या आहेत. मात्र यापैकी काही घंटा गाड्यांचा वापर ग्रामपंचायत इतर कामांसाठी वापर करत आहे. यामुळे कचरा गोळा करणाऱ्या यंत्रणेवर ताण आला असून सहा ते आठ दिवसांतून एकदाच नागरिकांच्या घरातून कचरा उचलला जात आहे. सहा ते आठ दिवस कचरा घरातच कुजत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पाचगाव ग्रामपंचायतीने गावातील कचरा कोंडाळे बंद केले आहेत. त्याऐवजी लाखो रुपये खर्च करून घंटागाड्या खरेदी केल्या आहेत. या घंटा गाड्यांच्या सहाय्याने घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यात येतो. मात्र या घंटागाड्या पैकी एक घंटागाडी कित्येक महिन्यांपासून नादुरुस्त अवस्थेत आहे. एक घंटा गाडी लाईट कामासाठी वापरण्यात येते तर एकीचा वापर हा किरकोळ कामांसाठी करण्यात येत असल्याची माहिती ग्रामपंचायतीमधून देण्यात आली आहे.
पाचगाव ग्रामपंचायतीकडे दोन ट्रॅक्टर आणि काही महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या आणखी तीन घंटागाड्या आहेत. एकूण पाच घंटागाड्याद्वारे सुमारे 40 हजार लोकसंख्येच्या पाचगाव मध्ये कचरा गोळा करण्यात येत आहे. सहा ते आठ दिवसांतून एकदाच प्रत्येक भागात घंटागाडी येत आहे. यामुळे सहा ते आठ दिवसांचा कचरा नागरिकांच्या घरातच कुजत आहे. परिसराला कोंडाळा नसल्यामुळे हा कचरा कुठेही टाकता येत नाही. घरातच हा कचरा कुजून त्याच्यावर घुंगुरट्या, माशा, डास यांची पैदास होत आहे. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही नागरिक नाईलाजास्तव रस्त्याच्या कडेला हा कचरा टाकत आहेत.
आर. के. नगर, पाचगाव परिसरातील अनेक रस्त्यां शेजारी हा कचरा पावसाच्या पाण्यात कुजत आहे. कोंडाळा नसल्यामुळे ग्रामपंचायतीने देखील असा रस्त्याच्या शेजारचा कचरा कित्येक दिवसांपासून उचललेला नाही. यामुळे अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे.
बंद असलेल्या घंटागाड्या सुरू करण्यासाठी प्रयत्नशील ग्रामपंचायत प्रशासनाने परिसरातील रस्त्याशेजारी कुजणारा कचरा उचल करावा. घंटा गाड्यांचा वापर कचरा उठाव करण्यासाठीच करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
प्रत्येक प्रभागासाठी एक घंटागाडी याप्रमाणे नियोजन करण्यात येणार आहे. बंद असलेल्या घंटागाड्या सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
संग्राम पाटील, पाचगाव सरपंच पाचगाव ,आर के नगर परिसरात घंटागाडीद्वारे कचरा वेळेवर उठाव होत नसल्याने अनेक ठिकाणी रस्त्याशेजारी नागरिक कचरा टाकत आहे .