धरणातून १०५० क्युसेक वेगाने पाणी सोडल, पुरस्थिती गंभीर
कोल्हापूर पद्धतीचे सात बंधारे पाण्याखाली
पाटगांव / वार्ताहर
पाटगांव मध्यम प्रकल्पातील मौनी सागर जलाशय पुर्ण क्षमतेने भरला असून धरणाच्या सांडव्यातून सुमारे ७५० क्युसेक आणि वीज निर्मितीसाठी ३५० क्युसेक असे एकुण १०५० क्युसेक पाणी वेदगंगा नदीपात्रात पडत असल्याने वेदगंगा नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने पुर परिस्थिती गंभीर बनत चालली आहे . वेदगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वहात आहे. धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने वर्षभराचा पिण्याचा व शेतीसाठी च्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. दरम्यान सांडव्यातून पडणारे मासे पकडण्यासाठी पाटगाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे यावेळी प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गर्दी करू नका असे आवाहन केले.
पाटगांव मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात चार दिवस मुसळधार पाऊस पडत असून मौनी सागर जलाशयाच्या पाण्याची पातळीत सातत्याने वाढ होत होती पण प्रशासनाने वेळीच खबरदारी घेऊन धरणातुन अगोदरच विसर्ग चालु ठेवल्याने पूरपरिस्थिती नियंत्रणात आणली आहे. मात्र धरण क्षेत्रातील मुसळधार पावसाने तसेच कोंडूशी, फये, मेघोली लघुप्रकल्पाच्या सांडव्यातून पडणाऱ्या पाण्याने वेदगंगा नदीचे पाणी सध्या धोक्याचा पातळीवरून वहात आहे.धरणात पुर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला असून धरणात सुमारे ३.७५टि. एम.सी. पाणीसाठा झाला आहे धरण परिसरात आज सुमारे ५१५३मि .मि.पावसाची नोंद झाली आहे. प्रकल्प पूर्ण संचय पातळी – 626.60 मी. इतकी असून आजची पाणी पातळी – 626.75 मी. झाली आहे.
आजचा एकूण पाणीसाठा – 106.474 द.ल.घ.मी धरणात 101.17% पाणीसाठा झाला आहे.गतवर्षाच्या तुलनेत सुमारे ३०० मि.मि. कमी पावसाची नोंद झाली असून गेल्या चोवीस तासात पाटगांव परिसरात २३३ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. वेदगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने तालुक्यातील शेळोली, शेणगाव, गारगोटी, म्हसवे, निळपण व वाघापूर .करडवाडी कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे काही अशी वहातुक विस्कळीत झाली आहे.
धरण परिसरात चार दिवस पावसाने थैमान घातले असून धरण परिसरात पडणाऱ्या पावसाने काही ठिकाणी झाडे पडून वीजसेवा, दुरध्वनी सेवा सलग तीन दिवस खंडीत झाल्याने पाटगांव सह दुर्गम भागातील काही गावे अंधारात आहेत त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे, सततच्या पावसामुळे नदी काठच्या उस पिका सह भातपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर पुर परिस्थिती वर भुदरगडचे प्रांत अधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसिलदार अमोल कदम, पाटबंधारे शाखा अभियंता विक्रम कारखानिस, उपशाखा अभियंता मनोज देसाई लक्ष ठेवुन आहेत नागरीकांना काम असेल तरच बाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले. प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
फोटो- पाटगाव धरण” मौनी सागर जलाशय” पूर्ण क्षमतेने भरला