असळज / प्रतिनिधी
सध्या ऊस तोडणी हंगाम मध्यावर आला असून साखर कारखानदाराकडून उसाची पळवापळवी चालू झाली आहे. तोडलेला ऊस लवकरात लवकर ऊस कारखान्यात पोहचावा यासाठी शेतकऱ्याची धडपड चालू असते, परंतू गगनबावडा तालुक्यातील अनेक गावांच्या शेत शिवारातील पाणंद रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने ऊस वाहतूकीची कोंडी निर्माण झाली आहे त्यामुळे मनुष्यबळाचा वापर करून ऊसाची वाहतूक करावी लागत आहे.परिणामी आतिक्रमण झालेले पाणंद रस्ते खुले करण्याची मागणी होत आहे. गावगाड्यापासून शेतशिवारात जाण्यासाठी किंवा वाहतूकीसाठी पाणंद रस्ते महत्वाचा दुवा आहेत महसूल खात्याकडे पाणंद रस्त्याची रुंदी पंधरा फुटापासून चाळीस फुटापर्यंत आहे परंतु या पाणंद रस्त्यालगच्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केल्याने अनेक गावात पाणांत रस्त्याचे अस्तित्वच शिल्लक राहिले नसल्याचे पहावयास मिळत आहे. परिणामी, या रस्त्यांच्या अतिक्रमणाचा सर्वाधिक फटका ऊस तोडणी हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून, रस्त्याअभावी ऊसाची वाहतूक ट्रॅक्टर व बैलगाडीऐवजी मनुष्यबळाचा वापर करून करावी लागत आहे. शेतमजुरांना ऊस वाहतूकीसाठी डोक्यावरून ऊसाची वाहतूक मुख्य रस्त्यापर्यंत करावी लागत आहे. एकमेकांच्या शेतामध्ये काम करण्याची परंपरागत पध्दत, बंद झाल्याने मजुरांची कमतरता भासत आहे परिणामी मजुरांना एका दिवसासाठी दोनशे ते तिनशे रुपये हजेरी मोजावी लागत आहे. पाणंद रस्त्याचे अतिक्रमण रस्त्यालगतचे शेतकरी करतातच आणि त्याचा त्रास इतर शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष सहन करावा लागतो.
गगनबावडा तालुका कमी लोकसंख्येचा तालुका आहे त्यामुळे प्रत्येक गावात गावकी- भावकीचे राजकारण चालते त्यामुळे मुद्दाम एकमेकांच्या शेतात जाणारे रस्ते आडवणे ऊस वाहतूक होणाऱ्या रस्त्यावर पाणी सोडणे, रस्ता न देण , शेतात जाण्यास वाट न ठेवणे अशा प्रकारचे प्रकार घडतात अशा लोकांच्यावर शासकीय यंत्रणेने कडक कारवाई करणे गरजेचे आहे.