धरणक्षेत्र वगळता इतरत्र पावसाची उसंत,41 बंधारे पाण्याखाली, पंचगंगेची पाणीपातळी 33.5 फुटांवर, पडझडीमध्ये 4 लाख 64 हजारांचे नुकसान, गगनबावडा तालुक्यात 63 मि.मी.पाऊस
प्रतिनिधी / कोल्हापूर
आठवड्याभरापासून दमदार सुरुवात केलेल्या पावसाने रविवारी उसंत घेतली. पण धरण क्षेत्रामध्ये मध्यम ते तुरळक पाऊस सुरु होता. पावसाचा जोर ओसरल्यामुळे पंचगंगेची पाणीपातळी अर्धा फुटाने कमी होऊन 33.5 फुटापर्यंत पोहोचली आहे. अद्याप 41 बंधारे पाण्याखालीच असून 14 बंधारे खुले झाले आहेत. राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1300 क्युसेक जलविसर्ग सुरु आहे. पावसामुळे घर व जनावरांच्या गोठ्याची पडझड होऊन सात तालुक्यात 4 लाख 64 हजारांचे नुकसान झाले आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 63 मि.मी पावसाची नोंद झाली आहे.
41 बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, शिरोळ व तेरवाड, भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, खडग कोगे व सरकारी कोगे, तुळशी नदीवरील आरे व बीड, कासारी नदीवरील यवलूज, ठाणे आळवे व पुनाळ तिरपण, कुंभी नदीवरील कळे, वारणा नदीवरील चिंचोली, खोची व तांदूळवाडी, दुधगंगा नदीवरील सिंध्दनेर्ली, सुळकुड, बाचणी व दत्तवाड, वेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, गारगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, सुरूपली, चिखली व शेणगाव, हिरण्यकेशी नदीवरील साळगाव, ऐनापूर, निलजी, गिजवणे, चांदेवाडी व हरळी, घटप्रभा नदीवरील पिळणी व बिजूरभोगोली, ताम्रपर्णी नदीवरील हल्लारवाडी, चंदगड व कुर्तनवाडी असे एकूण 44 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 39.71 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 51.407 टिएमसी पाणीसाठा आहे.
पडझडीमध्ये 4.64 लाखांचे नुकसान
पावसामुळे घरे व जनावरांच्या गोठ्यांची पडझड होऊन सात तालुक्यात 4.64 लाखांचे नुकसान झाले आहे. यामध्ये पन्हाळा आणि करवीर तालुक्यात प्रत्येकी 1 लाख 20 हजारांचे नुकसान झाले आहे. तर आजरा 51 हजार, गडहिंग्लज 63 हजार हातकणंगले 65 हजार, शाहूवाडी 15 हजार, तर कागल तालुक्यात 30 हजारांचे नुकसान झाले आहे.
तालुकानिहाय पाऊस (मि.मी.मध्ये)
हातकणंगले-14.2, शिरोळ-11.6, पन्हाळा-22, शाहूवाडी-25.8, राधानगरी-28.3, गगनबावडा-63, करवीर- 22.3, कागल-29.6, गडहिंग्लज- 18.6, भुदरगड-35.2, आजरा-32.5 तर चंदगड तालुक्यात 45.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
धरणांतील पाणीसाठा (दलघमीमध्ये)
तुळशी 52.28, वारणा 493.48, दूधगंगा 267.56 , कासारी 29.57, कडवी 31.67, कुंभी 38.13, पाटगाव 51.49, चिकोत्रा 21.07 , चित्री 30.95 r,जंगमहट्टी 13.98 , घटप्रभा 44.17 , आंबेआहोळ 14.09, कोदे (ल.पा) 5.23 तर जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे.
पंचगंगेची पाणीपातळी 35.5 फुटांवर
पंचगंगेची पाणीपातळी 35.5 फुटांवर असून सुर्वे 33, रुई 63.7, इचलकरंजी 59.5, तेरवाड 54.6, शिरोळ 49 , नृसिंहवाडी 48.9 तर राजापूर बंधाऱयाची पाणीपातळी 35.3 फूट आहे.