वारणानगर / प्रतिनिधी
जिल्ह्यात सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे पूर परिस्थिती आटोक्यात येण्यास मदत होणार आहे. वारणा खोऱ्याला वरदान ठरलेल्या वारणा नदीचा मुख्य जलसाठा असलेल्या वसंत सागर या चांदोली – वारणा धरणातून पाऊसाचा जोर मंदावल्याने वारणा नदीपात्रात धरणातून करण्यात येणारा विसर्ग सुमारे १० हजार क्यूसेसने कमी करण्यात आला आहे. वारणा पाटबंधारे उपविभाग कोडोलीचे सहा. अभियंता मिलींद किटवाडकर यानी याबाबत माहिती दिली.
गेली चार दिवस धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. दि. २१ जुलै पर्यन्त ८३३ मि.मी. पाऊस पडून धरणात पाणी साठा २६ टीएमसी होऊन धरण ७५.८७ टक्के भरले होते. दि. २२ जुलै पर्यन्त सकाळ पर्यन्त धरणातून ११०० क्यूसेस इतका विसर्ग होता दुपारी पाऊसाचा जोर वाढल्यावर विसर्ग ६००० क्यूसेस करण्यात आला तथापी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ढगफुटी होऊन धरणातील पाणी साठा झपाट्याने वाढू लागल्यावर रात्री ८ वा. धरणातून २२ हजार क्यूसेस विसर्ग सुरु करण्यात आला.
ढगफुटी सदृष्य पाऊसाने तब्बल ६ टीएमसी पाणी धरणात वाढत धरण ९५ टक्के भरलेच याशिवाय विसर्ग वाढवला तरी पाणी पातळी स्थिर राहिली आहे धरण क्षेत्रात ढगफुटीने तब्बल ५७४ मि.मी. पाऊस पडला. तर धरणात पाण्याची आवक ६६०२१ क्यूसेस झाली आहे. पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने व धरण भरत आल्याने धरणातून २८२५० क्यूसेस विसर्ग करण्यात आला होता.
आज, शनिवार सकाळी चांदोली धरणातील २८ हजारावरील होणारा विसर्ग कमी करून १९७५० क्यूसेस करण्यात आला आहे आज सकाळ पर्यन्त धरण क्षेत्रात २८५ मि.मी. नोंद झाली असून आज अखेर १८७७ मि.मी. पाऊस पडला असल्याचे शाखा अभियंता तानाजी धामणकर यानी सांगीतले.