प्रतिनिधी / कोल्हापूर
गेल्य विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेचा विश्वास होता, म्हणूनच भाजपला सर्वाधिक 1 कोटी 40 लाख इतकी मते मिळाली. त्यातून भाजपची राज्यातील ताकदही स्पष्ट झाली. पुढील विधानसभा निवडणूक कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने स्वतंत्रपणे लढवून दाखवावी. मग कोणाची ताकद किती आहे? हे साऱया देशाला कळेल, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती नसती तर भाजपच्या चाळीस जागाही निवडून आल्या नसत्या, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नुकतीच केली होती. आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत पवार यांच्या टीकेला उत्तर देताना महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना आव्हान दिले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ऑक्टोबर 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्यात युती नव्हती. दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. त्यावेळी भाजपचे 122 उमेदवार निवडून आले होते. भाजपच राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे 41 तर कॉंग्रेसचे 42 उमेदवार निवडून आले होते. त्यानंतर भाजप-शिवसेना युती सरकार सत्तेवरराहिले. युती सरकारने पाच वर्षात जनहिताचा राज्यकारभार केला. त्यामुळे नाईलाजाने युतीला विरोध करण्यासाठी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसवर एकत्र येण्याची वेळ आली. या निवडणुकीतही भाजपला राज्यात सर्वाधिक म्हणजे 1 कोटी 40 लाख मते मिळाली. शिवसेनेला 94 लाख मते मिळाली. राष्ट्रवादीला 92 लाख तर कॉंग्रेसला 82 लाख मते मिळाली. यावरून राज्यातील जनतेने कुणाच्या बाजूने कौल दिला होता ही बाब आणि भाजपची ताकद दिसून येते. आम्हाला सत्तेचा माज आला आहे, असे राज्यातील जनतेला वाटले नाही. म्हणूनच आम्हाला मतदारांनी सर्वाधिक मते दिली, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, मी दोन्ही कॉंग्रेससह शिवसेनेला आव्हान देतो की त्यांनी पुढची निवडणूक प्रामाणिकपणे स्वतंत्र लढवून दाखवावी. म्हणजे राज्यात कोणाची ताकद किती आहे हे देशाला समजेल.
सरकार पाडण्यासाठी काहीही करणार नाही
राज्यातील जनताच महाविकास आघाडीच्या सरकारच्या कारभाराबद्दल बोलू लागली आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी आम्ही काहीही करणार नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनाची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. जेथे महाविकास आघाडीचे सरकार चुकणार तेथे आम्ही विरोधी पक्ष म्हणून भूमिका घेऊन बोलणार, आंदोलन करणार. विरोधी पक्षाचे कर्तव्य पार पाडण्यात आम्ही मागे पडणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
शरद पवारांच्या मुलाखतीवर भाष्य
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची सामनासाठी घेतलेल्या मुलाखतीवर भाष्य करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना धीर देण्याबरोबरच महाविकास आघाडीचे सरकार बदलणार नाही, असा संदेश देण्याचा प्रयत्न या मुलाखतीव्दारे पवार यांनी केला आहे.