कोकण, सोलापूरसह अन्य मार्ग सुरु
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनामुळे एक महिना बंद असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी.ची सेवा सोमवारपासून (दि. 7) सुरु झाली. 50 टक्के प्रवाशांवर ही सेवा सुरु झाली असून कोल्हापूर- पुणे या मार्गावर सर्वाधिक प्रवाशांचा प्रतिसाद आहे.
कोरोनामुळे राज्यात संचारबंदी आणि जिल्ह्यात कडक लॉकडाऊन केल्यामुळे लोक बाहेर पडले नाहीत. तसेच आंतरजिल्हा प्रवासासाठी मनाई होती. या सर्वाचा एस.टी.च्या प्रवासी वाहतूकीवर परिणाम झाला. जवळपास एक महिना एस.टी.बंद होती. यामुळे एस.टी.ला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला.
एस.टी. चा पुनःश्च हरी ओम…!
— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) June 7, 2021
.
.#msrtc#msrtcofficial pic.twitter.com/9tUS5fiBqp
एक महिन्याच्या कालावधीनंतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच रुग्णसंख्या कमी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. यामुळे शासनाने निर्बंध शिथिल केल्यामुळे सोमवारपासून एस.टी.ची प्रवासी वाहतूक सुरु झाली आहे. यापूर्वी जिल्ह्यातंर्गत चंदगड, गडहिंग्लज, आजरा, गारगोटी, इचलकरंजी, शिरोळ, मलकापूर, राधानगरी, कागल या मार्गावर एस.टी.सुरु होती. जिल्ह्याबाहेर सांगली, सातारा व पुणे या मार्गावर सेवा सुरु होती. पण प्रवाशांचा फारसा प्रतिसाद नव्हता. दोन दिवसापासून मात्र कोल्हापूर
-पुणे मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे.
सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत कोल्हापूरातून – पुण्याला आठ बस रवाना झाल्या होत्या तर पुण्याहून कोल्हापूरात सहा बसेस आल्या होत्या. मुंबईसाठीही बस सोडण्यात आल्या आहेत. कोकण आणि सोलापूर मार्ग सुरु करण्यात आले आहेत. पण या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद नाही. यामुळे प्रवासी उपलब्ध झाल्यास या मार्गावर बसेस सोडण्यात येत आहेत. एस.टी. चाके धावू लागल्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकात चालक, वाहक, कर्मचारी आणि प्रवाशांच्या लगबगीचे चित्र होते.
प्रवासी वाढल्यास मार्ग वाढवण्याचे नियोजन
प्रवाशांची काळजी घेऊन एस.टी.सुरु करण्यात आली आहे. एका फेरीनंतर बस पुर्ण सॅनिटाईज केली जाते. 25 प्रवासी असावेत असा नियम असून प्रवासी उपलब्ध झाल्यावर बस सोडण्यात येते. मध्यवर्ती बसस्थानकात फलाटाच्या समोर बस उभा करुन प्रवाशांची प्रतीक्षा केली जात आहे. प्रवाशांची गर्दी वाढल्यास बसच्या फेऱयांमध्ये वाढ करण्याचे एस.टी.प्रशासनाचे नियोजन आहे.
रेल्वे स्टेशनवर शुकशुकाटच
कोरोनामुळे रेल्वे गाड्याही बंद आहेत. प्रवाशांअभावी एक महिन्यापासून कोल्हापूरातून विविध मार्गावर धावणाऱ्या महत्वाच्या गाड्या बंद आहेत. सद्या कोयना, तिरुपती आणि आठवड्यातून एकदा शुक्रवारी धावणारी धनबाद या गाड्या सुरु आहेत. धनबाद वगळयात कोयना आणि तिरुपती या गाड्यांना कोल्हापूरातून प्रवाशांचा फारसा प्रतिसाद नाही.