प्रतिनिधी / कोल्हापूर
पुरबाधित ऊस तोडण्यास अनेक कारखाने शेतकऱ्यांची गळचेपी करतात. तसेच पुरबाधित ऊस तोडताना मजूर व वाहतूकदाराकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. प्रत्येक कारखाना निहाय पुरबाधित क्षेत्राची माहिती व ते तोडण्याचे नियोजन ही सर्व माहिती साखर कारखान्याने हजर करून त्या प्रमाणे या हंगामात अंमलबजावणी करण्याच्या सक्त सूचना जिल्हाधिकारी यांनी साखर कारखान्यांना कराव्यात अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून केली.
ती तात्काळ मान्य करून जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी या पुरबाधित क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी व आंदोलक संघटना यांची व्यापक बैठक घेण्याचे मान्य केले. यावेळी आंदोलन अंकुश चे प्रमुख धनाजी चुडमुंगे, दत्तात्रय जगदाळे, सुनील बाबर, वीरचंद पाटील उपस्थित होते.