गावची एकी करा पुनर्वसनासह रोजगारही उपलब्ध करून देण्याची मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही
प्रतिनिधी / शिरोळ
तुम्ही गावाची एकी करा तुमचं पुनर्वसन तर करूच त्याचबरोबर आपल्या रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. शासन आपल्या पाठीशी ठाम आहे. कोणतीही चिंता करू नका सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागांच्या भेटीसाठी आले होते. येथील पद्माराजे विद्यालयातील पुरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला त्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्न करू. शिरोळ, शिरटी हसूरमधील पुरग्रस्त महिलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या काही महिलांनी आमचे पुनर्वसन करा अशी मागणी केली. यावर बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, गावातील सगळी एकी करा त्यांचे पुनर्वसन तर करूच शिवाय रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. सध्या पूरग्रस्त नागरिकांच्या खात्यावर रोख दहा हजार रुपयांची मदत व दहा किलो तांदूळ, दहा किलो गहू पाच किलो डाळ पाच लिटर रॉकेल ही मदत सुद्धा देण्यास सुरुवात केली आहे. शासन आपल्या पाठीशी ठाम असून जास्तीत जास्त अर्थ सहाय्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
प्रारंभी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखानाला भेट दिली कारखान्यांचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मुख्यमंत्री ठाकरे श्रीक्षेत्र नरसिंह वाडी येथील पूरग्रस्त भागास भेट देऊन पाहणी केली. तेथील व्याप नागरिक व व्यापार यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ पालक मंत्री बंटी पाटील आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार उल्हास पाटील, दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, शिवसेनेचे मुरलीधर जाधव, सर्जेराव शिंदे, तातोबा पाटील, विठ्ठल पाटील, बाबा पाटील, प्रकाश गावडे, शरद उर्फ बापू मोरे, संजय पाटील, प्रकाश पाटील टाकवडेकर, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे, धुमाळ गट विकास अधिकारी शंकर कवितके, उपनगराध्यक्ष राजेंद्र माने यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी दहा पोलीस अधिकारी 90 पोलीस कर्मचारी 30 होमगार्ड रेक्सु फोसचे जवान असा मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आरोग्य विभागाचे पथकही सज्ज ठेवण्यात आला होता.
शिरोळ शहरातील तरुण कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देऊन यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली यावर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.