भाजपचा महाविकास आघाडीला सवाल
धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी भाजपचे ठिय्या आंदोलन
मंदिर उघडा या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले
प्रतिनिधी / कोल्हापूर
लॉकडाऊन शिथिल करुन जनजीवन पूर्वपदावर येणे आवश्य आहे. राज्य सरकारने बारहा अन्य उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी परवानगी दिली, आता मंदिर कधी सुरु करणार असा सवाल भारतीय जनता पार्टीने केला आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी भजन किर्तनाच्या माध्यमातून भक्तिमय गीते साजरी करून सरकारला जाग येण्यासाठी साकडे घातले. मिरजकर तिकटी येथे हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, गेले सात महिने मंदिरे बंदच आहेत. हिंदूधर्मामध्ये आध्यात्माला अत्यंत महत्व आहे. कोणताही भाविक मंदिरामध्ये गेला कि त्याचा मानसिक ताण कमी होतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने सातत्याने मंदिरे उघडण्याची मागणी आहे. सरकार दुर्लक्ष करीत आहे. सरकारला याची किंमत मोजावी लागणार असा इशारा दिला. संघटन सरचिटणीस अशोक देसाई यांनी महाराष्ट्रात मंदिरे उघडा या मागणीसाठी आंदोलन करायला लागणे हे अत्यंत दुर्देवी असल्याचे नमूद केले.
सरचिटणीस विजय जाधव म्हणाले, कोरोनावर मात करण्यासाठी हे सरकार अपयशी ठरले आहे. सरकारने महसूल गोळा करण्याच्या हेतूने मद्यालये सुरू केली आहेत मात्र लोकांची श्रद्धा असणाऱ्या धार्मिक स्थळांवर अजून अनेक निर्बंध घातले आहेत. मंदिरा बाहेर असणाया छोटे साहित्य विकणारी दुकाने, खाद्य दुकाने यांची उपजीविका या मंदिरावर अवलंबून आहे अशा अनेक लहान घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आई अंबाबाई चरणी प्रार्थना करून या ठाकरे सरकारला येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर मंदिरे उघडण्यासाठी सुबुद्धी द्यावी ही प्रार्थना केली.
यावेळी नगरसेविका उमा इंगळे, प्रमोदिनी हर्डीकर, गिरीष साळोखे, विजयसिंह खाडे-पाटील, विशाल शिराळकर, अप्पा लाड, चंद्रकांत घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलना मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.