मनसेने लावला ग्रामपंचायत कार्यालयासमोर फलक
प्रतिनिधी/वाकरे
बालिंगे (ता. करवीर) येथील गेली कित्येक वर्षे रखडलेली पेयजल योजना केव्हा पूर्ण कधी होणार? असा सवाल करणारा डिजिटल फलक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभारला आहे. त्यामुळे सदरचा फलक बालिंगे गावासह परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. ग्रामपंचायत सदस्यांना कार्यालयात जाताना या डिजीटल फलकासमोरून जावे लागत आहे. या फलकात अपूर्ण कामाचे फोटो दाखवण्यात आले असून पेयजल योजनेचा लेखाजोखा दिला आहे.
बालिंगे गावची पेयजल योजना सन २०१३ ते २०१६ च्या कालावधीत शासनाकडून मंजूर होऊन कामकाज सुरू झाले. तत्कालीन ग्रामपंचायत सदस्यांनी योजना पूर्ण न करता दिरंगाई करून ग्रामस्थांची घोर फसवणूक केली आहे. संबंधीत ठेकेदाराने योजना पूर्ण करून एक ते तीन महिने चालवून दाखवायची असते. तसेच योजना योग्य असल्याचा ग्रामस्थांचा अभिप्राय नोंदवून ठेकेदाराने ग्रामसभेत प्रस्ताव दाखल करावयाचा असतो. त्यानंतर योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्यावयाची असते पण असे कोणतेच सोपस्कार पूर्ण केलेले नाहीत. त्यामुळे ही योजना “असून अडचण नसून खोळंबा आहे ” असे या डिजीटल फलकावर लिहिले आहे.
बालिंगे ग्रामपंचायतीकडून मीटरप्रमाणे पाणी बिल वसूल केले जात नाही. सद्यस्थितीत निम्म्याहून अधिक गावाला जुन्याच पाईपलाईनमधून पाणी मिळत आहे. त्यामुळे ही योजना पूर्ण झाली आहे कसे म्हणता येईल? तसेच नळ जोडणीसाठी आवश्यक असणारे पाणी मीटर संबंधीत ठेकेदाराने बसवून द्यावयाचे आहेत. त्यासाठी कोणतेही जादा शुल्क ग्रामस्थांनी अदा करायचे नाही. जोपर्यंत मुबलक व शुद्ध पाणी मिळत नाही तोपर्यंत पाणी बिल ग्रामस्थांनी भरू नये असे आवाहनही मनसेने डिजीटल फलकावर केले आहे. फलकावर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील यांचे नाव आहे.