अनिल कामीरकर / गारगोटी
दूधगंगा वेदगंगा सह. साखर कारखाना लि. बिद्री साखर कारखान्याने कोरोना महामारीच्या काळात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभा केला आहे. या प्रकल्पाच्या शुभारंभासाठी सत्तारूढ आघाडीचे नेतृत्व करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांना निमंत्रण दिले नसल्याने सत्तारूढ आघाडीचे “गरज सरो व वैद्य मरो” हे धोरण निदर्शनास येत असल्याचे पत्रक भाजपाचे जिल्हा संघटनमंत्री नाथाजी पाटील यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
कोरोना महामारीच्या काळात अनेक कोरोना रुग्णांना ऑक्सीजन मिळत नाही. ऑक्सीजनची होणारी कमतरता लक्षात घेता बिद्री कारखान्याने ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभरण्याचा संकल्प केला तो अल्पावधीत पूर्ण ही केला. कोरोना रुग्णांचे ऑक्सीजन अभावी होणारे हाल कमी करण्याचा दृष्टीने कारखान्याने उभारलेला प्रकल्प निश्चितच कौतुकास्पद असल्याचे पाटील यांनी सांगितले.
बिद्रीच्या संचालक मंडळात भाजपाचे ५ संचालक प्रतिनिधीत्व करतात. या कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात या ५ संचालकांनी सत्तारूढ आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या मा. चंद्रकांत दादा व राजे समरजित घाटगे यांना निमंत्रण देण्याबाबत चर्चा करायला हवी होती पण या संदर्भात तेथे कोणतीही चर्चा झालेली दिसत नाही.
खरे तर ४ वर्षापूर्वी बिद्रीची निवडणूक होऊ घातली असताना व भाजपाबरोबर युती करुन ही निवडणूक जिंकली असताना भाजपाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना अशा चांगल्या कार्यक्रमांना बोलावणे आवश्यक आहे. पण निवडणूकीत युतीसाठी आग्रही असणाऱ्या सत्तारूढ नेत्यांना निवडणूकीनंतर मात्र भाजपाच्या नेत्यांचा सोयीस्कर विसर पडलेला दिसतो असे नाथाजी पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.