प्रतिनिधी / शिरोळ
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याची माहिती असूनही शिरोळ तालुक्यात पुरग्रस्तांच्या न्यायासाठी मोर्चा काढल्याप्रकरणी शिरोळ तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण समितीच्या १४ जणांवर शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जरी गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नसल्याचा इशारा रामचंद्र डांगे व डॉ. संजय पाटील यांनी दिला आहे.
शिरोळ तालुक्यात पुरामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. त्यांच्या न्याय हक्कासाठी तब्बल 30 मागण्या घेऊन मंगळवारी शिरोळ तहसील कार्यालयावर शिरोळ तालुका पूरग्रस्त समितीच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो हे माहीत असताना तसेच मोर्चामध्ये कोरोनाबाधित रुग्ण असू शकतो याची कल्पना असताना बेजबाबदारपणे वागल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये समितीचे अध्यक्ष रामचंद्र डांगे, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, डॉ. संजय पाटील, दगडू माने, विजय पवार, बाळासाहेब माळी, अॅडव्होकेट सुशांत पाटील, सुरेश सासणे, विनोद पुजारी, सुनील इनामदार, आयुब खान पठाण, इक्बाल, बागवान, दशरथ काळे व उमेश कर्नाळ या १४ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची फिर्याद पोलीस हेडकॉन्स्टेबल मदन मधाळे यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान आंदोलकांनी अद्याप शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. कितीही गुन्हे दाखल करा आम्ही पुरग्रस्तांच्या मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.