प्रतिनिधी / इचलकरंजी
वाढत्या लोकसंख्येबरोबरच शहराला चांगल्या सुविधा देण्यासाठी इचलकरंजीत अनेक योजना राबविल्या जात आहेत. शहरातील वाढीव भागातील कबनुर व शहापूर हद्दीतील सर्व सांडपाणी एकत्र करून त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी 2014 मध्ये सुमारे 82.5 कोटींची भुयारी गटर योजना कार्यान्यावित करण्यात आली. या योजनेच्या सुरुवातीपासूनच निर्माण झालेल्या वादाने टक्केवारीचा विषय शहरात चर्चेचा झाला होता. आज या योजनेचा वाढीव खर्च 97.5 कोटीवर पोहचला आहे. पालिकेतील सत्तासमिकरने बदलल्यानंतर तरी ही योजना पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. पण त्यातही अडथळ्यांची शर्यत संपली नाही.
या योजनेतील महत्वाचा टप्पा म्हणजे एसटीपी प्रकल्प. हा दुसरा प्रकल्प कोठे उभा करायचा याबद्दल अनेक वाद झाले. शेवटी टाकवडे वेस येथे हा प्रकल्प उभा करण्याचे निश्चित करण्यात आले. पण येथील नागरिकांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केल्यानंतर पुन्हा या प्रकल्पाचा मुद्दा ऐरणीवर आला.
यावेळी प्रशासनाने अगदी पोलीस बंदोबस्तात नोव्हेंबर 2018 मध्ये या प्रकल्प उभारणीचा शुभारंभ केला. यासाठी अगदी युद्धपातळीवर काम सुरूही करण्यात आले. सुमारे 2 ते 3 एकर क्षेत्राला पत्रे मारून बंदिस्त करण्यात आले. संपवेलसाठी 40 ते 50 फूट खोलीचा खड्डा खणण्यात आला. यातच काही महिन्याचा कालावधी गेला, अन पुन्हा गेल्या वर्षभरापासून हे काम पुन्हा ठप्प झाले. या कामासाठी आणलेले जेसीबी मशीन, ट्रॅक्टर, पाईप व इतर साहित्य अक्षरशः गंजत पडले आहे. या कामाच्या मक्तेदाराने मुदातवाढीचा प्रस्ताव दिला होता. अनेकवेळा मुदतवाढ देऊनही हे काम पूर्ण होत नसल्याच्या कारणाने पालिकेने 28 फेब्रुवारी 2020 च्या सभेत मक्तेदाराच्या मुदतवाढीच्या प्रस्तावास स्थगिती दिली.
याबाबत मक्तेदाराने न्यायालयात धाव घेतली. पण न्यायालयाने या कामाच्या स्थगितीबाबत आजपर्यंत कोणताही स्थगिती आदेश दिलेला नाही. तरीही गेल्या 1 वर्षांपासून येथील काम बंदच आहे. त्यामुळे एकंदरीतच शहरातील या भुयारी गटर योजनेचे भवितव्यची अधांतरी असल्याचे समोर येत आहे.