भूविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी
`भूविकास’साठी 550 कोटींची तरतुद, कर्मचाऱ्यांनाही सरकार 283 कोटी देणार
मालमत्तांवर सरकारचा ताबा, भूविकासच्या दारात फटाके फोडून साजरा केला जल्लोष
प्रतिनिधी / कोल्हापूर
भूविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी भागवण्यासाठी 550 कोटी रुपये देणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार शेतकऱ्यांना 267 कोटींची कर्जमाफी तर कर्मचाऱ्यांना थकित देण्यापोटी 283 कोटी रुपये मिळणार आहेत. या बदल्यात राज्यातील 15 भूविकास बंकांच्या मालमत्ता सरकार ताब्यात घेणार आहे. बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात शेतकरी, कामगार प्रतिनिधींच्यासमवेत झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले.
या निर्णयाचा कोल्हापूर जिल्ह्यातील 942 थकबाकीदार शेतकऱ्यांना 37 कोटींची कर्जमाफी होऊ शकते तर 208 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 12 कोटी 41 लाख रुपये मिळणार आहेत. दरम्यान या निर्णयाची माहिती मिळताच जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी भूविकासच्या दारात फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
बैठकीला सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री बच्चू कडू, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, अरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील (यड्रावकर), आनंदराव अडसूळ, आमदार प्रकाश आंबिटकर, आमदार वैभव नाईक, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, भूविकास बँक कर्मचारी संघर्ष कृती समिती महासंघाचे प्रतिनिधी भागवत इंगळे व इतर संघटनेचे पदाधिकारी तसेच शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून श्रीमती बबिता कोठेकर नागपूर उपस्थित होते.