आमदार चंद्रकांत पाटील यांची मागणी
144 कलम लावून चळवळ दडपण्याचा प्रयत्न
मराठा समाज आता थांबणार नाही
प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्यसरकारने तातडीची बैठक घेऊन मराठा समाजासाठी 1500 कोटी रुपये जाहीर करावे, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना येथे केली. सरकारने मुंबईत लावलेले 144 कलम हे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नव्हे तर मराठा आंदोलनाच्या भितीने लावले असून अशा पध्दतीने चळवळ दडपता येणार नाही, अशी टीका ही त्यांनी केली.
आ. पाटील म्हणाले, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 144 कलम लावण्यापेक्षा यातून मार्ग काढावा. कुठलेही कलम लावा, अता मराठा समाज थांबणार नाही. सरकारने तातडीची पॅबिनेटची बैठक घेऊन मराठा समाजासाठी 1500 कोटी रुपये घोषित करावेत. यावर्षी 642 अभ्यासक्रमांची फी भरणार असल्याचे सरकारने घोषित करावे. 10 लाखांचे कर्ज घेणाऱयांचे व्याज आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ भरत आहे. ती संख्या वाढवावी. तसेच गेल्या 4 महिन्यांपासून हप्ता भरल्यानंतर व्याज परताव्याची तरतुद केलेली नाही, ती तात्काळ करावी. भाजप सरकारच्या काळात पुरेसा निधी दिल्याने 20 हजार तरुण-तरुणींनी बँक प्रकरणे करता आली.
ते पुढे म्हणाले, मराठा आरक्षण या विषयात जो कोणता कायदेशीर मार्ग सरकारने सुचवित आहे, त्यामध्ये विरोधी पक्षाचेही मत घ्यावे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण स्थगितीविरोधात दाद मागणे हा मार्ग आहे का?, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना विनंती करुन खंडपीठ लवकर करुन तारखा लवकर चालवा असे सांगू शकतो का? असे जे पर्याय वाटतात ते तातडीने अवलंबनणे हा मार्ग आहे. यावर 144 कलम लावणे हा मार्ग नाही.
सरकारने `सारथी’ची वाट लावली
राज्य सरकारने `सारथी’ची वाट लावली आहे. यामध्ये तुमचे संचालक घ्या, तुमच्या कार्यकर्त्यांना संधी देऊन मोठ करा, परंतु ही संस्था पुन्हा सुरु करा. ती सुरु झाल्यास स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी व परदेशात संशोधन करण्याची संधी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळेल, असे आ. पाटील म्हणाले.