ताराराणी आघाडी पक्षाची मागणी : महापालिका प्रशासनांना निवेदन : एक महिन्याचे पाणी बिलही माफ करा
प्रतिनिधी / कोल्हापूर
2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि भीषण महापुरात शहर आणि उपनगरातील बाराहजार पाचशेहून अधिक मिळकतींचे नुकसान झाले. त्याचा आर्थिक फटका संबंधित मिळतकधारकांना बसला. त्यातील केवळ 2500 मिळकतधारकांनाच महापालिकेकडून माफीची सवलत मिळाली आहे. मात्र इतर सुमार दहा हजार नुकसानग्रस्त मिळकतधारक माफीच्या सवलतीपासून वंचित राहिले आहेत. त्यांचा निम्मा घरफाळा आणि एक महिन्याचे पाणीबिल माफ करण्यात यावे, अशी मागणी ताराराणी आघाडी पक्षाने एका निवेदनाव्दारे महापालिकेच्या प्रशासकांकडे केली आहे.
ताराराणी आघाडीचे माजी गटनेते सत्यजित कदम यांच्यासह माजी महापौर सुनील कदम, माजी नगसेवक राजसिंह शेळके, माजी नगरसेविका सीमा कदम, कविता माने यांनी प्रशासकांना दिलेल्या निवेदन म्हटले आहे की, 2019 च्या महापुरात नुकसान झालेल्या मिळकतधारकांना दिलासा देण्यासाठी घरफाळ्यात 50 टक्के सूट देण्याचे आणि एक महिन्याचे पाणीबिल माफ करण्यास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. महापुरात प्रत्यक्षात बाराहजार पाचशे मिळकतधारकांचे नुकसान झाले आहे.
शासनाच्या महसूल विभागाकडे पूरग्रस्त नागरिकांची यादी आहे, त्याची पडताळणी करून शहरातील पूरग्रस्तांना न्याय देण्यात यावा. बाराहजार पाचशे मिळतकधारकांपैकी केवळ 2500 मिळकतधारकांना माफीची सवलत मिळाली आहे. महापूर आलेल्या कदमवाडी परिसर, जाधवाडी, बापट कॅम्प परिसर, मुक्त सैनिक वसाहत, शाहूपुरी परिसरत, नागाळापार्क, रमण मळा परिसर या भागातील मिळकतधारक सवलतीपासून वंचित राहिले आहेत. त्यांच्याकडे महापालिका प्रशासनाने गेली वर्ष, दीड वर्ष दुर्लक्ष केले आहे. या सर्वांना मार्च 2021 पर्यत सवलतीचा लाभ देण्यात यावा.