म्हासुर्ली येथे आगीत नुकसान झालेल्या कुटूंबियांना केली मदत, ग्राहकसेवेबरोबरच जोपासली जातेय सामाजिक बांधिलकी
प्रतिनिधी / कोल्हापूर
महापूर असो अथवा कोरोना महामारी. महावितरणच्या कळे उपविभागाच्यावतीने प्रत्येक संकट काळात विविध समाजघटकांना मदतीचा हात देऊन त्यांना आधार दिला आहे. राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली येथील एका ग्रामस्थाच्या घरास लागलेल्या आगीत मोठÎा प्रमाणात नुकसान झाले होते. या कुटूंबियांना उपकार्यकारी अभियंता एस.पी.पाटणकर यांनी प्रापंचिक साहित्याचे वाटप करून त्यांना आधार दिला आहे.
वीज यंत्रणा सक्षम ठेवून अखंडीत आणि सुरळीतपणे वीज पुरवठा करण्याबरोबरच दिन, दुबळ्यांना आणि आपत्तीग्रस्तांना मदत करण्यामध्ये महावितरणच्या कळे उपविभागाचे अधिकारी व कर्मचारी नेहमीच आघाडीवर असतात. महावितरणचे काम करत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून आजतागायत कळे उपविभागाकडून अनेक उपक्रम राबविले आहेत. म्हासुर्ली येथील केरबा वारीक यांच्या घराला लागलेल्या आगीत घरातील संपूर्ण प्रापंचिक साहित्य भस्मसात झाले. घरातील धान्यासह जनावरांच्या चाऱयाही जळून खाक झाला. याची दखल घेऊन उपकार्यकारी अभियंता एस.पी.पाटणकर यांनी म्हासुर्ली येथे जावून वारीक कुटूंबियांना ज्वारी, गहू, साखर, तेल, तांदूळ अशा जिवनोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी महावितरणची कंत्राटी कामे घेणारे आकुर्डे (ता.पन्हाळा) येथील ठेकेदार विठ्ठल पाटील यांनी पाच किलो गोडे तेल दिले. याबद्दल वारीक कुटूंबियांनी महावितरणचे आभार मानले.
अखंडीत वीज पुरवठ्यासाठी सदैव तत्पर
महावितरणच्या कळे उपविभागांतर्गत सुमारे 75 ते 80 गावांचा समावेश आहे. यामधील बहुतांशी गावे नदीकाठावर वसलेली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात नदीपात्रातून पाणी बाहेर पडले की या गावांतील शिवारात पाणी शिरते. विद्युत खांबासह, इतर विद्युत यंत्रणेभोवती पाणी असते. अशा कालावधीत वीज यंत्रणेत बिघाड झाल्यास ते दुरुस्त करणे जोखमीचे असते. तरीही पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत विद्युत कर्मचारी तत्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम तातडीने करतात. त्यामुळे या गावांत वीज पुरवठा अखंडीत सुरु असतो.