प्रतिनिधी / कोल्हापूर
‘मास्क नाही प्रवेश नाही, मास्क नाही वस्तूही नाही, मास्क नाही सेवा नाही’ हा कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी राबविलेला अभिनव उपक्रम राज्यभर राबवायला हवा, अशा शब्दात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी कौतुक केले.
पुणे महसूल विभागातील जिल्ह्यांशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरंसींगद्वारे संवाद साधला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह संबंधित जिह्याचे पालकसचिव सहभागी झाले होते.
कोल्हापूर येथून जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रभारी पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे, राजर्षी शाहू वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे आदी उपस्थित होते.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम लोकचळवळ व्हावी. यातून महाराष्ट्र आरोग्य संपन्न होण्यासाठी ती जिह्यात प्रभावीपणे राबवावी. मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर राखणे यासाठी नागरिकांमध्ये प्रभावी जनजागृती होणे गरजचे आहे. `मास्क नाही तर प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तू नाही’ असा अभिनव उपक्रम कोल्हापूरने सुरु केला आहे. हा उपक्रम कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपयुक्त ठरेल त्यामुळे हा उपक्रम राज्यभर राबवायला हवा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, कोरोना रुग्णांना लागणारा आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी राज्य शासनाने टँकर उपलब्ध करुन द्यावेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्गया नजिकच्या जिल्ह्यासह सीमा भागातून उपचारासाठी रुग्ण येत आहेत. त्यामुळे फिजिशिएन उपलब्ध व्हावेत. एनआयव्ही, एचएफएन खाटांची क्षमता वाढवून ठेवावी लागेल. त्यासाठी नियोजन करण्यात आले असून आवश्यक असणारा राज्य आपत्ती निवारणमधील निधी मिळावा.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, व्यापारी, दुकानदार या ठिकाणी मोहिमेच्या प्रचारासाठी स्टिकर्स लावले जात आहेत. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य हे आपल्या गावांमध्ये, प्रभागांमध्ये प्रबोधनाचे होर्डिग्ज लावत आहेत.