केंद्रीय नागरी उड्डान मंत्रालयाचा ट्रु जेट कंपनीला इशारा , ‘तरुण भारत’च्या वृत्ताची केंद्र सरकारच्या स्तरावर दखल
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर मार्गावरील (रूटवरील) पन्नास टक्के रद्द करण्यात आलेल्या फ्लाईट तातडीने सुरू करा, अन्यथा या रूटवरील आपली सेवा रद्द करण्यात येईल, असा सज्जड इशारा केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाच्या प्रशासनाने ट्रु जेट विमान कंपनीला दिला आहे. तरुण भारताने 17 सफ्टेंबरच्या अंकात कोल्हापूर-मुंबई मार्गावरील 50 टक्के फ्लाईट रद्द या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध करून त्यामुळे विमान प्रवाशांचा सहन करावा लागणारा त्रास आणि निर्माण झालेल्या अडचणी मांडल्या होत्या. या वृत्ताची माहिती काही विमान प्रवाशांसह जागरूक नागरिकांनी केंद्र सरकारकडे ट्व्टिव्दारे केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाकडे पाठविल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत प्रशासनाने ट्रु जेट विमान कंपनीला इशारा दिला आहे.
कोल्हापूर-मुंबई विमानसेवेला चांगला प्रतिसाद असताना गेल्या महिन्याभरात या हवाई मार्गावरील पन्नास टक्क्यांहून अधिक फ्लाईंट रद्द ट्रु जेट विमान कंपनीने रद्द केल्याची माहिती ‘तरुण भारत’ने प्रसिद्ध केल्यानंतर विमान प्रवाशांसह इतर क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमठल्या होत्या. फ्लाईट अचानकपणे रद्द करण्याचे प्रकार घडत असल्याने विमानप्रवाशांचा प्रचंड प्रमाणात खोळंबा होत असल्याची बाबही प्रकाशात आणली होती. फ्लाईट रद्द करण्याच्या कारणाचा शोध घेण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यामध्ये लक्ष घालण्याची गरज असल्याची विमान प्रवाशांची मागणीही मांडली होती.
दरम्यान, काही विमान प्रवाशांनी ‘तरुण भारत’ची बातमी सोशल मीडियावर व्हायरल केली. तसेच ट्व्टिही केली. विमान समितीवर सल्लागार म्हणून काम पाहिलेले माजी सदस्य समीर शेठ यांनी नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अधिकाऱयांना ट्व्टिव्दारे तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झालेली बातमी आणि विमान प्रवाशांच्या भावना कळविल्या. तसेच फ्लाईट रद्द होत असल्याने कोल्हापूरवर झालेल्या परिणामाची माहिती दिली. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या जाॅईंट सेक्रेटरी उषा पदी यांनाही या संदर्भात फोनव्दारे माहिती दिली. त्यानंतर विमान उड्डाण मंत्रालयाच्या प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत ट्रु जेट विमान कंपनीला थेट इशारा दिला आहे. कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर फ्लाईट नियोजनानुसार सुरू ठेवा, अन्यथा या मार्गावरील आपली सेवा रद्द करण्यात येईल. या संदर्भातील मेसेज थेट ट्रु जेटच्या व्यवस्थापनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उडाण प्रोजेक्ट पंतप्रधान मोदींचा ड्रिम प्रोजेक्ट
देशातील सर्व लहान, मध्यम आणि मोठी शहरे एकमेकांशी जोडण्यासाठी आणि हवाई मार्गाने दळवळण वेगाने व्हावे यासाठी उडाण प्रोजेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झाला. देशातर्गंत विमान बळकट करण्यासाठी हा प्रकल्प त्यांच्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे कोल्हापूर-मुंबई मार्गावरील रद्द फ्लाईटची दखल केंद्रीय स्तरावर गंभीरपणे घेण्यात आली. मात्र या प्रकाराकडे स्थानिक लोकप्रतिनिधी गंभीरपणे पाहून पाठपुरावा करणे आवश्यक होते. पण ते झाले नाही. जागरूक विमानप्रवाशांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठपुराव करून केंद्राला दखल घेण्यास भाग पाडले.