महिन्याभरातील चित्र : विमान प्रवाशांचा खोळंबा; लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज
संजीव खाडे / कोल्हापूर
कोल्हापूर-मुंबई विमानसेवेला चांगला प्रतिसाद असताना गेल्या महिन्याभरात या हवाई मार्गावरील पन्नास टक्क्यांहून अधिक फ्लाईंट रद्द करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. हैदराबादस्थित मुख्यालय असणारी ट्रु जेट कंपनी कोल्हापूर-मुंबई विमानसेवा देत असून अचानकपणे फ्लाईंट रद्द करण्याचे प्रकार घडत असल्याने विमान प्रवाशांचा प्रचंड प्रमाणात खोळंबा होत आहे. दरम्यान, फ्लाईट रद्द करण्याच्या कारणाचा शोध घेण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी विमान प्रवाशांतून होत आहे.
कोल्हापूरच्या उजळाईवाडी विमानतळावरून मुंबई, बेंगळूर, हैदराबाद, तिरूपती आदी मार्गावर विमानसेवा सुरू आहे. या ठिकाणी जाणार्या प्रवाशांची संख्याही चांगली असल्याने प्रतिसादही लाभत आहे. कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवा सर्वाधिक महत्वाची, सोयीची आणि उपयुक्त मानली जाते. या मार्गावर ट्रु जेट कंपनीच्या विमानाची फ्लाईट आठवड्यातील मंगळवार, बुधवार आणि गुरूवार या तीन दिवशी असते.
तासाभरात मुंबईत पोहचता येत असल्याने या मार्गावरील विमानसेवेला कोल्हापूरकरांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. 72 सिटर (आसन क्षमता) विमानातील जवळपास 80 ते 90 टक्के सीटचे ऍडव्हान्स बुकींगही आधीच होत असते. विमान भाडे 2600 रूपयांच्या जवळपास असल्याने रेल्वे, खासगी ट्रव्हल्सपेक्षा प्रवाशांचा ओढा विमानसेवेकडे वाढला आहे. वास्तविक दुपारची वेळ काहीशी सोयिस्कर नसली तरी कोल्हापूरकरांनी सातत्यपूर्ण प्रतिसाद दिल्याचे प्रवाशी संख्येवर स्पष्ट होते. वैद्यकीय कारणांसह आंतरराष्ट्रीय फ्लाईटशी संबंधित असणारे प्रवासी तसेच सरकारी अधिकारी, उद्योजक आदींसाठी विमानसेवा सोयीची ठरते. आपल्या आई, वडील, आजी, आजोबांना विमानाची सैर करून असणार्यांच्या भावनाही या विमानसेवेत गुंतल्या आहेत. विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या प्रारंभी दोन दिवस आधी कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचे प्रवासी भाडे तब्बल चौदा हजार रूपयांपर्यंत पोहचले होते. यावरून मिळणारा प्रतिसाद लक्षात येतो.
गेल्या महिन्याभरात 50 टक्के फ्लाईट रद्द
गेल्या महिन्याभरात कोल्हापूर-मुंबई मार्गावरील 50 टक्के फ्लाईट ट्रु जेट कंपनीने रद्द केल्या आहेत. ऑपरेशनल रिजन अर्थात तांत्रिक स्वरूपाचे कारण सांगून या फ्लाईट रद्द केल्याचे मेसेज (ईमेल, एसएमएसव्दारे) तिकीट बुक केलेल्या प्रवाशांना फ्लाईटच्या आधी दोन दिवस पाठविण्यात आले. त्यामुळे ऐनवेळी विमानाऐवजी इतर सेवांचा आधार घेण्याची वेळ प्रवाशांवर आली. वैद्यकीय, शासकीय, शैक्षणिक, औद्योगिक कामासाठी मुंबईला जाण्याचे नियोजन केलेल्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. गेल्या महिन्याभरात पन्नास टक्के फ्लाईट रद्द झाल्याने प्रवाशांतही नाराजी पसरली आहे.
रद्द केलेले विमान जाते कुठे?
ट्रु जेट कंपनीची कोल्हापूर-मुंबई मार्गावरील अचानकपणे रद्द करण्यात आलेली विमाने मग कुठे जातात? तांत्रिक कारण दोन दिवस आधी कंपनीला कसे समजते? असे प्रश्न प्रवाशांतून उपस्थित केले जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रद्द केलेली विमाने तिरूपती, हैदराबाद, बेंगळूर आदी मार्गावरील सेवेसाठी पाठवली जातात. या मार्गावरील विमानभाडे मुंबईपेक्षा जास्त असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे फ्लाईट रद्द करण्यामागे खरोखरच ऑपरेशनल रिजन आहे, की इतर काही कारणे आहेत? याचा शोध स्थानिक लोकप्रतिनिधी असणार्या खासदारांनी घ्यावा, ट्रु जेट कंपनीला अडचणी असतील, तर त्या सोडवाव्यात आणि प्रवाशांचा होणारा खोळंबा थांबवावा, अशी मागणी होत आहे.
अशी आहे कोल्हापूर-मुंबई विमानसेवा (वेळापत्रक)
दर आठवड्यात मंगळवार, बुधवार, गुरूवार तीन दिवस फ्लाईट
- मुंबईहून कोल्हापूरसाठी निघते दुपारी 12:55 वाजता
- कोल्हापूरला पोहचते दुपारी 2:05 वाजता
- कोल्हापूरहून मुंबईसाठी निघते दुपारी 2:30 वाजता
- मुंबईत पोहचते दुपारी 3:30 वाजता