जि. प. सदस्य शिवाजीराव मोरेंचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
प्रतिनिधी / वारणानगर
मराठा आरक्षण कायम राहण्याबाबत राज्य सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबत मोरे यांनी शिष्ठ मंडळासह जनसुराज्याचे संस्थापक आमदार डॉ. विनय कोरे यांची भेट घेवून चर्चा केली.
यावेळी मोरे म्हणाले, मराठा समाजाच्या अनेक वर्षाच्या मागणीला यश म्हणून महाराष्ट्र शासनाने सन २०१८ साली शैक्षणिक व नोकरीत मराठा आरक्षण दिले. सदर आरक्षण मिळणेबाबत मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने मोर्चे काढले. यासाठी सर्वपक्षीय संघटनांनी मदत केली. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अनेक तरुणांनी बलिदान दिले आहे. आरक्षणासाठी अनेक वर्षे समाजाने लढा दिला आहे. तसेच मागासवर्गीय आयोगासमोर देखील मराठा आरक्षणाबाबत बाजूही मांडली गेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न घटनापीठाकडे वर्ग करताना त्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आली हा निर्णय मराठा समाजावर अन्याय करणारा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा प्रश्न स्वतः जातीने लक्ष देवून तसेच आरक्षणाची स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा असेही जि. प. सदस्य मोरे यांनी सांगून आरक्षणासाठी पुढील काळात जो काही संघर्ष करावा लागेल त्यामध्ये मराठा समाजासोबत आपण नेहमी अग्रभागी राहणार असल्याचे सांगितले. आरक्षण मिळालेच पाहिजे त्यासाठी केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करावी अशी मागणी यापूर्वीच आम्ही केली होती. त्यासाठी राज्य शासनाने हे केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणे आवश्यक होते. पण या प्रश्नात केंद्र आणि राज्य सरकारने दुर्लक्ष केले घटनादुरुस्ती केली असती तर आरक्षण मिळाले असते पण सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने आता महा विकास आघाडी सरकारने महत्वाची भूमिका घेणे गरजेचे असल्याचे मोरे यांनी सांगितले.
आज मराठा समाजावर अन्याय झाला आहे आम्ही राज्यघटनेचा आणि न्यायव्यवस्था चा आदर करतो मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे आणि स्वतःच्या आयुष्याची होळी केली हजारो लोकांचे संसार उध्वस्त झाले त्यामुळे मराठा आरक्षणाला न्याय देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने द्यावा असे ते म्हणाले.