जिल्हाधिकार्यांचे निर्देश
प्रतिनिधी / कोल्हापूर
संसर्ग रोखण्यासाठी, मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी काँटॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या. एका रुग्णामागे 15 ते 20 ट्रेसिंग झाले पाहिजे. मोठय़ा प्रमाणात तपासण्या वाढवा, प्रतिबंधात्मक क्षेत्रात नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन सर्वेक्षण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रविवारी संबंधित यंत्रणेला दिले. तसेच आशा, शिक्षक, पर्यवेक्षक यांच्यामार्फत प्रभागनिहाय, गावनिहाय सर्व्हेक्षण करावे. नागरिकांनीही लवकर उपचार सुरु करण्यासाठी आपली लक्षणं न लपविता सहकार्य करावे, असे आवाहन ही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांनी संपर्क साधला. यावेळी त्यांनी कोविड-19 बाबत सद्यस्थितीचा तालुकानिहाय आढावा घेतला. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, प्रभाग समिती, ग्राम समिती पुन्हा एकदा सक्रीय करुन प्रभावी काँटॅक्ट ट्रेसिंगचे काम करा. संसर्ग रोखण्यासाठी, मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी काँटॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या. तलाठी, ग्रामसेवक यांनी समन्वयाने जबाबदारी पार पाडावी. एका रुग्णामागे 15 ते 20 ट्रेसिंग झाले पाहिजे. मोठय़ा प्रमाणात तपासण्या वाढवा. इली, सारीच्या रुग्णांचीही माहिती मिळवा. खासगी डॉक्टर्स, वैद्यकीय दुकानदार यांचा व्हॉटसपग्रुप तयार करुन या ग्रुपच्या माध्यमातून रुग्णांची माहिती आणि पुढील कार्यवाहीचे नियोजन करा.
डॉ. कलशेट्टी यांनी कसबा बावडय़ासारख्या ठिकाणाहूनही स्वॅब घेण्यास प्रारंभ केला आहे. ग्रामीण आणि शहरी अशा भागात समन्वयाने काँटॅक्ट ट्रेसिंग आणि सर्वेक्षणाचे काम करा. शहरातील स्वच्छता मोहिमेत सहभागी असाणारे सामाजिक कार्यकर्ते, संस्था हे देखील या सर्व्हेक्षणात योगदान देणार आहेत. त्यांचीही मदत घ्या. प्रतिबंधित क्षेत्राची अंमलबजावणी करावी, असे निर्देश दिले.
अमन मित्तल यांनीही सर्वेक्षणावर भर देवून, तो होतो का याची तपासणी करा अशी सूचना केली. डॉ. अनिता सैबण्णावर यांनी यावेळी उपचार प्रोटोकॉलविषयी तर डॉ. उषादेवी कुंभार यांनी पोर्टल अपडेशनविषयी सूचना केली.
मास्कचा वापर न करणार्यांवर दंडात्मक कारवाई करा
मास्कचा वापर, सामाजिक अंतर, वारंवार हात धुणे आदीबाबत जनजागृती करा. अंमलबजावणी न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा. गावांसाठी नियुक्त संपर्क अधिकाऱ्यांना सक्रीय करा. सर्व्हेक्षण आणि ट्रेसिंगचे काम प्रभावीपणे होते का याचीही तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी देसाई यांनी यावेळी दिले.
सर्वेक्षणात नगरसेवक, सार्वजनिक मंडळांचा सहभाग ठेवा
प्रतिबंधात्मक क्षेत्रात नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन सर्वेक्षणही व्हायला हवे. प्रभागनिहाय, गावनिहाय सर्वेक्षण करतान नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, संस्थ, सार्वजनिक मंडळे यांचाही सहभाग घेवून लोकांनी लोकांसाठी केलेले सर्व्हेक्षण व्हायला हवे. 15 दिवसात चांगले चित्र दिसेल. मृत्यूदरही कमी राखण्यास मदत होईल, असेही जिल्हाधिकार्यांनी सांगितले.
बाहेर फिरणायांना 5 हजाराचा दंड
गृह अलगीकरणातील व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास 5 हजाराचा दंड लागू केला असून त्याची अंमलबजावणी करा, विनामास्क दिसणार्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा असे निर्देश महापालिका आयुक्त कलशेट्टी यांनी देऊन अर्ली डिटेक्शन फार महत्त्वाचे आहे, असे सांगितले.