प्रतिनिधी / कोल्हापूर
भुदरगड तालुक्यातील मेघोली लघू पाटबंधारे तलाव काल, रात्रीच्या सुमारास फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. रात्रीच्या वेळी तलाव फुटल्याने नागरिकांचा एकच गोंधळ उडाला. यात मेघोली, नवले, सोनूर्ली ममदापुर, वेंगरूळ गावचे मोठं नुकसान झाले आहे. तर, नवले येथील जिजाबाई धनाजी मोहिते (वय-५५) या वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. या सर्व दुर्घटनेचा जलद गतीने पंचनामा पुर्ण करण्यात आला. तलाव फुटून जवळपास ३०० हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी पंचनाम्यातून निर्दशनास आले आहे.
मेघोली प्रकल्प फुटल्याची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. रात्रीच्या झोपेत असणारे अनेक नागरिक ओढ्याच्या दिशेने धावले. पाणी पाहण्यासाठी नागरिकाने मोठी गर्दी केली होती. तलाव रात्रीचा फुटल्याने पाण्याच्या प्रवाहाचा आवाज तब्बल दोन किलोमीटरपर्यंत येत होता. ओढ्याचे हे आक्राळ-विक्राळ रूप पाहून नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले. भुदरगड तालुक्यातील मेघोली लघू पाटबंधारे तलाव रात्री फुटला.तलाव फुटल्याचे समजताच परिसरात एकच गोंधळ उडाला पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता यामध्ये ओढ्याच्या दोन्ही बाजूची सर्व पिके वाहून गेली. ही घटना रात्री साडे दहाच्या सुमारास घडली. मेघोली,नवले, सोनूर्ली ममदापुर, वेंगरूळ गावचे मोठं नुकसान झाले आहे.
१९९६ साली या तलावाच्या कामाला सुरुवात झाली. २००० साली या तलावात प्रथम पाणीसाठा करण्यात आला. ९८ द.ल.घ.फू. पाणीसाठा केला जात होता. या तलावाच्या कामासाठी सुमारे ४ कोटी ७० लाख रूपये खर्च झाले. सुरूवातीपासूनच या तलावात गळती लागली होती. तलावाची गळती काढावी यासाठी या परिसरात शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केली होती. मात्र या कडे गंभीरपणे न पाहिल्याने या परिस्थितीस सामोरे जावे लागले आहे. तलाव केवळ अडीच तासांत पाणी वाहून जाऊन रिकामा झाला आहे. मेघोली तलाव मधील पुराच्या पाण्यात बुडून नवले येथील जिजाबाई धनाजी मोहिते या महिलेसह चार जनावारांचा मृत्यू झाला. तलावाच्या बांधातील माती, दगड, गोटे वाहून ओढ्याकाठच्या शेतीत पडल्याने शेकडो एकर शेतीसह पिके पुर्णतः: उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे या परिसरात ढगफुटी सारखे दृश्य झाले आहे.
तत्कालीन सभापती किर्ती देसाई यांनी पंचायत समितीच्या बैठकीत वेळोवेळी तलावाच्या दुरुस्तीची मागणी केली होती. गत वर्षी आमदार प्रकाश आबिटकर, बाबा नांदेकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन गळतीची पाहणी केली होती. दुरुस्तीचा प्रस्ताव हा नाशिक येथे पाठविण्यात आला होता. तरी देखील दुरूस्तीसाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत.
दरम्यान, गारगोटी- वेसर्डे रोडवरील वेंगरूळ जवळचा पूल पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्याने या मार्गावरून वेसर्डे, नवले, आजरा या ठिकाणी होणारी वाहतूक बंद झाली आहे.दरम्यान, आमदार प्रकाश आबिटकर,सत्यजित जाधव,विश्वजित जाधव जिल्हाधिकारी राहूल रेखावार, तहसिलदार अश्विनी अडसुळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत