३८ केंद्रांवरील महिन्याभरातील चित्र, आजपासून पुन्हा पुर्ण क्षमतेने सुरु होणार, कोरोनाच्या संकटसमयी सर्वसामान्यांना दिलासा
प्रवीण देसाई / कोल्हापूर
कोरोना महामारीच्या संकटकाळात मोफत शिवभोजन थाळी सुरु करुन राज्य शासनाने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. त्याला आता पुन्हा १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात जिल्ह्यातील ३८ केंद्रांवर १ लाख ८० हजार लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. स्थानिक कडक लॉकडाऊनमुळे आठ दिवसांपासून बंद असलेली शिवभोजन थाळी आज, सोमवारपासून पुन्हा सुरु होणार आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने १५ एप्रिलपासून लॉकडाऊन लागू केला आहे. या काळात सर्वसामान्यांची अन्नाविना हेळसांड होऊ नये, यासाठी मोफत शिवभोजन थाळी वितरणास सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यात जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांच्या माध्यमातून याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. जिल्ह्यातील ३८ केंद्रांवर थाळीचे दररोज ६ हजार थाळ्यांचे वितरण सुरु होते. यामध्ये शहरातील १० व ग्रामीण भागातील २८ केंद्रांचा समावेश आहे. १५ एप्रिल ते १५ मे या एक महिन्याच्या कालावधित जिल्ह्यात १ लाख ८० हजार लाभार्थ्यांना लाभ झाला आहे.
जिल्ह्यात १५ ते २३ मे या कालावधित स्थानिक कडक लॉकडाऊनमुळे आठ दिवस शिवभोजन थाळीचे वितरण बंद राहिले. आता पुन्हा आज, सोमवारपासून दररोज ६ हजार थाळ्यांच्या नियोजनानुसार जिल्ह्यातील ३८ केंद्रांवर त्याचे वितरण सुरु होणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवभोजन थाळीला १५ जूनपर्यंत मुदतवाढ दिल्याने सर्वासामान्यांना दिलासा मिळाला आहे.
पार्सलसेवा सकाळी ११ ते दुपारी ४
शिवभोजन थाळीचे वितरण सकाळी ११ ते दुपारी ४ यावेळेत उपलब्ध होणार आहे. कोरोनासंदर्भातील सर्व नियम पाळून पार्सल पध्दतीने थाळीचे वितरण करण्याबाबत सुचना यापूर्वीच जिल्हा पुरवठा विभागाने केंद्र चालकांना दिल्या आहेत.
सबळ कारणाशिवाय शिवभोजन बंद राहणार नाही
कोणताही लाभार्थी शिवभोजनाशिवाय परत जाणार नाही याची दक्षता घ्यावी, कोणत्याही सबळ कारणाशिवाय शिवभोजन केंद्र बंद राहणार नाही याची दक्षता घ्यावी, दररोज संपूर्ण केंद्र निर्जंतुकीकरण करावे, केंद्रातील कर्मचारी व पार्सल घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांना मास्क वापरणे बंधनकारक राहील, केंद्रांवर सामाजिक अंतराच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही निर्देश जिल्हा पुरवठा विभागाने केंद्रचालकांना दिल्या आहेत.
राज्य शासनाने सर्वसामान्यांसाठी १५ एप्रिलपासून मोफत शिवभोजन थाळी सुरु केली आहे. गेले आठ दिवस स्थानिक लॉकडाऊनमुळे याचे वितरण बंद होते. आता आज, सोमवापासून त्याचे पुन्हा वितरण सुरु होणार आहे. याबाबत केंद्रचालकांना सुचना देण्यात आल्या आहेत.
– दत्तात्रय कवितके, जिल्हा पुरवठा अधिकारी