कोल्हापूर / अहिल्या परकाळे
श्री गणेशाच्या स्वागतासाठी वाद्ये असतात.यामध्ये ढोल ताशांचा गजर मोठा असतो. यंदा मात्र कोरोना महामारीने गणेशोत्सव अत्यंत साध्या पध्दतीने साजरा होत आहे. शनिवारी लाडक्या गणरायाची सर्वत्र उत्साहात प्रतिष्ठापना झाली.पण यंदा गणेशाच्या स्वागतासाठी ढोल -ताशा, पारंपारिक वाद्यांचा गजर झालाच नाही.यामुळे टाळया वाजवत आणि साध्या पध्दतीने गणेशाचे स्वागत करण्यात आले.मात्र दुसऱया बाजुला पारंपारिक वाद्ये वाजवणाऱयांना आर्थिक फटका बसला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यापासून देश लॉकडाऊन आहे. त्यामुळे गुढीपाढवा, अक्षयतृतीया, वटपोर्णिमा, नागपंचमी आदी सण साध्या पध्दतीने साजरे करण्यात आले. गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट असल्याने गणपतीचे स्वागत वाजत गाजत न होता साध्या पध्दतीने करण्यात आले. त्यामुळे गणेशोत्सवावर अवलंबून असणाऱया मुर्तीकारापासून ते अनेक विविध घटकांना आर्थिक फटका बसला. आगमनावेळी आणि विसर्जनावेळी वाजत गाजत श्रींचे स्वागत केले जाते. यंदा मात्र आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल, बापट कँप, शाहुपुरी, गंगावेश आदी ठिकाणी ढोल-ताशाचा गजर ऐकायला मिळाला नाही. ढोल ताशाऐवजी टाळया वाजवत आणि गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यामुळे ढोल ताशा पथक, लेझीम पथक यासह अन्य करमणुकीच्या पथकांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक फटका बसला. शहरातील करवीर नाद, करवीर गर्जना, शाहू गर्जना, स्वराज्य, महालक्ष्मी प्रतिष्ठान या ढोल-ताशा पथकांना मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले.
कापूर विक्रेत्यापासून मुर्तीकाराचेही नुकसान
गतवर्षी महापुराचा फटका तर यंदा कोरोनामुळे ढोल-ताशा वाजवण्यास परवानगी मिळाली नाही. दरवर्षी जवळपास दिवसाला 20 ते 25 मिरवणूका करून लाखो रूपयांची उलाढाल व्हायची.यंदा मात्र एकही मिरवणूक करता आली नाही. गुढीपाढव्यापासून आतापर्यंत सर्वच सण-समारंभ, मिरवणूका न झाल्याने पथकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. वर्षात गणेशोत्सव हा आमच्यासाठी पर्वणी असते. कोरोनामुळे गणेशोत्सवात कापूर विक्रेत्यापासून ते मुर्तीकारापर्यंत सर्वांचे नुकसान झाले.
निखिल गावडे (करवीर गर्जना पथक प्रमुख)