मनपा स्वच्छता मोहिमेची एशी कि तैशी कोल्हापुरी वैभवाचे विद्रुपीकरण
तलावाबाहेर इतक्या बाटल्या तर पाण्याखाली किती
नंदकुमार तेली / कोल्हापूर
रंकाळा चौपाटीवर शनिवारी महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रंकाळा चौपाटीवर स्वच्छता मोहिम राबविली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी रविवारी या मोहितेची एशी कि तैशी झाली. रंकाळा चौपाटीवर मद्याच्या बाटल्यांचा खच पडून राहिल्याने मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांनी कोल्हापुरी वैभवाचे विद्रुपीकरण थांबले पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्या.
पर्यटकांसह शहर व परिसरातील हजारो नागरिक रंकाळयाचे सौंदर्य पाहण्यासाठी, मॉर्निंग वॉकसाठी व सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी येत असतात. नेहमीच या ठिकाणी नागरिकांची वर्दळ असल्याने खाद्य पदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे अंबाबाई मंदिरा समोरील रस्ता ताराबाई रोड हा रंकाळयाकडे जाणारा प्रमुख रस्ता असल्याने या मार्गावरही मोठया प्रमाणात खाद्य पदार्थ व भाजी विक्रेते आहेत.
रंकाळा चौपाटीवर मद्यापींचा सध्या सुळसुळाट असल्याचे पडलेल्या मद्याच्या बाटल्यांचा खच यावरून लक्षात येते. मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांना रविवारी रंकाळा चौपाटीवर मद्याच्या बाटल्यांचा खच पडल्याचे निदर्शनास आले. मनपा कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कोरोना महामारीच्या काळातही साफ-सफाईचे काम करत आहेत. तसेच ताराबाई रोडवर भाजी विक्रेते, खाद्य पदार्थ विक्री करणारे स्टॉलसह इतर व्यवसाय मोठया प्रमाणात आहेत. या रोडवर असणाऱ्या कोंडाळयामध्ये कचरा न टाकता तो विस्कळीत स्वरूपात आहे. हा विस्कळीत कचरा रस्त्याच्या मधोमध आल्याने नागरिकांना कचऱ्यातून वाट शोधावी लागते आहे.
लोकसहभाग वाढविण्याची गरज
शहरासह उपनगरांमध्ये मोठया प्रमाणात नागरिकरण झाले आहे. त्याप्रमाणात कचराही वाढला असून मनपा प्रशासनावर दिवसें-दिवस ताण वाढत चालला आहे. आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी मनपा प्रशासनाबरोबर लोकसहभाग महत्वाचा आहे. स्वच्छता मोहिम मनपातर्फे राबविण्यात येते. दररोज सफाई कर्मचारी साफ-सफाई, कचरा संकलनाचे काम करतात. मात्र, विस्कळीत पडून राहणाऱ्या कचऱ्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मनपा प्रशासनावरील वाढलेला ताण कमी करण्यासाठी स्वच्छता मोहिमेत लोकसहभाग वाढविणे गरजेचे आहे.
तर पाण्यात किती मद्याच्या बाटल्या
रंकाळा चौपाटीवर मद्याच्या बाटल्यांचा खच इतका पडला आहे. तर तलावातील पाण्यामध्ये किती बाटल्या असतील, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. अनलॉक झाल्यामुळे रंकाळा चौपाटीवर नागरिकांची गर्दी वाढली आहे. खाद्य पदार्थांच्या गाडयांवरील कचरा, मद्याच्या बाटल्यांचा खच आदींमुळे परिसराचे विद्रुपीकरण होत आहे. यावर नियंत्रणासाठी प्रशासनाबरोबर नागरिकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे.