गड संवर्धन करणाऱ्या युवकांनी केले प्रयत्न
वार्ताहर / पाटगाव
भुदरगड तालुक्यातील रांगणा उर्फ प्रसिध्द गडाच्या पुर्वेकडील बाजूस दाट जंगलात खोल दरीत सुमारे ९०० फुटावर अंदाजे ५०० ते ६०० किलो वजनाची तोफ गड संवर्धन करणाऱ्या युवकांनी अथक परिश्रमानंतर दोरखंडाच्या सहाय्याने सुरक्षितपणे गडावर आणली.
इसवीसन १८४४ च्या सुमारास गडकऱ्यांचे बंड दडपताना इंग्रजांनी गडावरील दोन तोफा दरीत ढकलल्या होत्या. या दोन्ही तोफा १९८९ साली पाटगाव धरणावरील कनिष्ठ अभियंता कै. बी जी.चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी शोधली होत्या. त्यानंतर गेली पंधरा वर्षे या तोफेबाबत कुणालाही माहिती नव्हती.
सन २०१३ मध्ये दुर्ग संशोधक भगवान चिले यांच्या मार्गदर्शनाखाली शांताराम लींकर, महादेव सावंत, सुहास पाटील, कांतीबाई पाटील, अवधूत पाटील, अनिल माने संदीप प्रभुलकर यांनी आठशे फूट खोल दरीत उतरून या तोफेचा परत शोध लावला दगड माती अर्धवट तुटलेली आणि काटेरी झुडपात लपून राहिलेली तोफ त्यांनी खुली केली. त्यानंतर सुमारे आठ ते दहा वर्ष या तोफेला वर आणण्याचे नियोजन करण्यात येत होते. याबाबत छत्रपती संभाजी राजे यांच्याबरोबर तोफ गडावर कशी आणता येईल याची चर्चा पण झाली होती पण अध्यावत यंत्रसामुग्री येणे अवघड असल्याने तरुणांनी पुढाकार घेत मानवी बळाचा वापर करण्याचे ठरवले त्यानंतर गेली महिनाभर दरीतील तोफ गडावर आणण्याचा निर्धार कोल्हापुर जिल्ह्यातील मावळा प्रतिष्ठानने केला होता. यासाठी वेळोवेळी गडाला भेट देऊन व दरीच्या जागेची पाहणी करून मोहिमेचे योजनाबद्ध ड्रॉईंग, नकाशे, विविध परवानग्या घेऊन नियोजन करण्यात आले त्यानंतर टप्प्याटप्प्याने दरीतून तो काढण्याचे काम हाती घेण्यात आली सोमवारी सायंकाळी सुमारे ९०० किलो वजनाची तोफ गडावर आणण्यासाठी यश मिळाले.
तोफ वर काढत असताना क्षणोक्षणी शिवाजी महाराजांची प्रेरणा व शिवजय घोषात अगदी उत्साहात तोफ वर आणण्याचे काम चालू होते.
गडावर तोफ आल्यानंतर शिवरायांचा जयघोष करत मावळ्यांनी आनंद व्यक्त केला. यामध्ये ६० मावळ्यांनी आपला सहभाग नोंदवला. या कामी कांतभाई पटेल, महादेव फराकटे (बिद्री)अवधुत पाटील, अनिल जाधव, शशिकांत पाटील( तिरवडे) व संघर्ष ग्रुप खानापूर, तिरवडे, बिद्री, बोरवडे, मुरगुड येथील शिवभक्तांची मोलाची साथ लाभली.मोहिमेत एच. आर. पाटील, ऋषिकेश जाधव, राहुल गणमाळे, तुषार पाटील, सचिन गिरगावे, अवधूत पाटील, संदीप देसाई, संजय गावडे, रवी गनमाळे, निलेश मगदूम यांच्यासह अनेकांनी योगदान दिले.
ब्रिटिश कालीन राजवटीमध्ये रांगणा गड कर वसुली करण्याचा नाका होता. या गडावर असंख्य तोफा होत्या. या तोफा स्वातंत्र्यसैनिकांना हाती लागू नये यासाठी इंग्रजांनी गडावरील सर्व तोफा दरीत फेकून दिल्या. त्यामुळे खोल दरीत पडलेल्या अशा अनेक तोफांचा शोध लागणे आवश्यक आहे. |
मोहिमेचे नियोजन २४ ते २६ जानेवारीला तोफ जंगलातून ४५० फूट वर आणण्यात आली. ६ ते ८ फेब्रुवारीला दुसऱ्या टप्यात तोफ आणखी ४०० फूट वर अवघड मार्गातूम वर चढवण्यात आली. आणि उर्वरित १५० ते २०० फूट बिकट व दुर्गम मार्गावरून सोमवारी (दि.१५) वर काढण्यात आली. |