आठ जणांच्या टोळक्याचा मेडिंग कामगारावर सशस्त्र हल्ला
प्रतिनिधी/इचलकरंजी
कबनूर (ता. हातकणंगले) येथील मुजावर पट्टीमध्ये एका मेडींग कामगारावर शनिवारी रात्री सुमारे सात ते आठ जणाच्या टोळक्याने सशस्त्र हल्ला करुन खून केला. संदीप सुरेश माघाडे (रा. आझाद नगर, कबनूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. त्यांचा खून गावातीलच एका राजकीय व्यक्तीच्या टोळीने केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले असून, पोलिसांनी खूनातील संशयीताचा शोध सुरु केला आहे. तर मृत माघाडेच्या नातेवाईक आणि मित्रांनी जोपर्यंत टोळीच्या प्रमुख असलेल्या ‘त्या’ राजकीय व्यक्तीसह सर्व संशयीताना अटक करण्यात येणार नाही. तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने येथील आयजीएम रुग्णालयात मोठा तणाव निर्माण झाल्याने, रुग्णालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
पोलिसांच्या तपासात हल्लेखोर म्हणून राहुल शिंदे, आकाश कांबळे, मोहसिन सनदी, रमजान सनदी, संदीप कांबळे (सर्व रा. कबनूर, ता. हातकणंगले) अन्य दोन ते तीन (अनोळखी) यांची नावे निष्पन्न झाली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी शिवाजीनगर, गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस आणि इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सुमारे चार पथके रवाना झाली आहेत. रात्री उशिरापर्यंत हल्लेखोरांना पकडण्यास पोलिसांना यश आले नव्हते.
पोलिसांच्याकडून व घटनास्थावरुन समजलेली माहिती अशी, कबनूर ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच झाली आहे. या निवडणूकीत मृत माघाडेवर सशस्त्र हल्ला करणार्या युवकाच्या टोळीचा म्होरक्या निवडून आला आहे. या निवडणूकच्या दरम्यान मृत माघाडे आणि टोळीप्रमुखामध्ये वाकुडपणा आला होता. असे असतान शनिवारी दुपारी किरकोळ कारणावरुन अल्पवयीन युवकाच्यामध्ये मोठा वाद झाला होता. हा वाद मृत माघाडे यांने आपसात मिटविला. तरीदेखील संशयीत आरोपीनी त्यांच्यावर खून्नस ठेवून त्यांचा खून करण्याचा चंग बांधला.
शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मृत माघाडे हा कामानिमित्याने गावच्या भरवस्तीमध्ये असलेल्या मुजावर पट्टी या परिसरातून जात होता. यावेळी त्यांच्या मागावर असलेल्या सुमारे सात ते आठ जणाच्या टोळक्याने शिवीगाळ करीत सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यात धार-धार हत्याराचा वर्मी घाव बसल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याची माहिती नातेवाईकांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी माघाडेला उपचारासाठी त्वरीत आयजीएम रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्यांच्या मृत्यु झाल्याची माहिती वैद्यकिय अधिकार्यांनी दिली.
जखमी माघाडेचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकासह मित्रांना समजताच त्यांनी आयजीएममध्ये धाव घेतली. त्यामुUे रुग्णालयाच्या आवारात मोठी गर्दी झाली होती. याचदरम्यान नातेवाईक व मित्रानी मृत माघाडेच्या खूनातील सर्व संशयीत आरोपीसह राजकीय नेता असलेल्या टोळी प्रमुखाला अटक करावी. अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भुमिका घेतली. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला नव्हता.
सत्कारानंतर हल्लेखोरांनी केला खून
कबनूरसह चंदूर, जंगमवाडी या तीन गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांततेत पार पडल्याबद्दल पोलिसांच्याकडून सर्व नवनिर्वाचित सदस्याचा सत्कार शनिवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास आयोजित करण्यात आला होता. हा सत्काराचा कार्यक्रम संपताच हल्लेखोरांनी मृत माघाडेवर प्राणघातक हल्ला करुन त्यांचा खून केला. त्यामुळे या सत्कार कार्यक्रमाची इचलकरंजी परिसरात वेगळी चर्चा रंगली होती.
वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची आयजीएमला भेट
माघाडेच्या खूनानंतर आयजीएम रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला होता. यांची माहिती समजताच अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनी, शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, गावभाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार आदी मोठा पोलीस फौजफाट्यासह हजर झाले. त्यामुळे रुग्णालय परिसराला पोलीस छावनीचे स्वरुप आले होते.