रेंदाळकर बंधूंचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना आवाहन
प्रतिनिधी / कोल्हापूर :
खोटी फिर्याद देण्यास नकार दिल्याने राजारामपुरी पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. झालेल्या मारहाणीची चौकशी करुन न्याय देण्याची मागणी राकेश रेंदाळकर, रोहित रेंदाळकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
रेंदाळकर म्हणाले, आपण पृथ्वी सप्लायर्स म्हणून जिप्मस कॉन्ट्रक्टिंग करणाऱया कंपनीमध्ये आपण सुपरवायझर आहे. सौरभ कदम हे कंपनीचे मालक आहेत. 13 मे रोजी सायंकाळी 5 वाजता राजारामपुरी पोलीस ठाण्यातील महेश पवार, सुरेश काळे आणि आणखी एक अशा तिघांनी घरातून काहीही कारण न सांगता आपल्याला सुभाषनगर पोलीस चौकीत नेले. काही वेळाने राजारामपुरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक डुबल यांच्या कक्षात नेले. याठिकाणी मोक्याच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पृथ्वी कंपनीचे मालक सौरभ कदम यांच्यावर खोटी फिर्याद देण्यास सांगितले. फिर्याद देण्यास नकार दिल्याने डुबल यांनी आपल्याला मारहाण करण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांना आदेश दिले. यामुळे पवार काळे व आणखी एका पोलिसाने आपल्याला बेदम मारहाण केली.
पोलीसांनी रोहित रेंदाळकर यांची भागीदारी असलेल्या कंदलगाव येथील कॅफे पनामा दि स्पोर्टस लॉऊंज या बंद असलेल्या हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे गेटवरुन उड्या मारुन प्रवेश केला होता. आतील कुलुप तोडले होते. याचे सीसीटीव्ही चित्रण त्यांनी सादर केले. याबाबत विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया व पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांना निवेदन दिले आहे. पण अद्याप या प्रकरणाची चौकशी झाली नाही किंवा न्याय मिळाला नाही. पोलिसांकडून न्याय मिळाला नाही तर न्यायालयात दाद मागणार असल्याचे रेंदाळकर यांनी सांगितले.
शहर पोलिस उप-अधीक्षकांतर्फे चौकशी
रेंदाळकर यांनी पोलिस अधीक्षक डॉ.शैलेश बलकवडे यांना निवेदन देवून न्याय देण्याची मागणी केली आहे. पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी करवीरचे पोलिस उप अधीक्षक आर.आर. पाटील यांना चौकशीचे आदेश दिले होते. पण पाटील रजेवर असल्याने ही चौकशी शहर पोलिस उपअधीक्षक यांच्याकडे दिली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.