प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाच्या काळात रासायनिक खतांच्या किंमती वाढल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे सदर रासायनिक खतांच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी पत्राद्वारे रासायनिक आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडाजी यांचेकडे खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे.
या पत्रात म्हटले आहे, रासायनिक खतांच्या किमंतीत ७०० ते ८०० रुपयांची वाढ झालेली आहे. गेल्या दिड वर्षापासून शेतीची कामे जरी सुरु असली तरी बाजारपेठा बंद असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती हालाखीची झाली आहे.
सध्याची रासायनिक खतांच्या किमंतीची वाढ ही शेतकऱ्यांना न परवडणारी आहे. खताच्या किमंती वाढु लागल्याने उत्पादन खर्चात वाढ होणार असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. रासायनिक खतांचे दर वाढत असल्याने उत्पादन खर्च अधिक होणार आहे. इंधनाचे दर वाढल्यानंतर आता खतांचे दर वाढल्याने शेतकरी नाराज झाले आहेत. तरी सदर खतांचे दर कमी करुन कोरोना महामारीच्या काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे.