थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेची धडक कारवाई : आयटी पार्कलाही दणका
प्रतिनिधी/कोल्हापूर
थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. बुधवारी रेल्वे विभागासह समाज कल्याण आणि वन विभागाचे विभागीय कार्यालय या केंद्र आणि राज्य शासनाच्या कार्यालयाची पाणी कनेकशन तोडण्याची कारवाई करण्यात आली. थकीत पाणीपट्टीसंदर्भात या विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱयांना वारंवार सूचना आणि नोटिसा दिल्यानंतरही त्यांनी पाणीपट्टी न भरल्याने पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला. सोमवारी आयटी पार्कवरही कारवाई करण्यात आली होती.
दरम्यान, पाणीपट्टी थकविणाऱया बारा ग्रामपंचायतींसह इतर इतर थकबाकीदार शासकीय कार्यालयांना नोटिसा पाठविण्यात आल्या असून त्यांच्यावरही पाणी कनेकशन तोडण्याची कारवाई होऊ शकते, असा इशारा जल अभियंता नारायण भोसले यांनी दिला आहे.
शासकीय कार्यालयांकडे 21 कोटी रूपयांची थकबाकी
शहरात असणाऱया विविध शासकीय कार्यालयांकडे सुमारे 21 कोटी 4 लाख रूपयांची पाणीपट्टी थकीत आहे. पाणी पुरवठा विभागाने थकीत पाणीपट्टी भरण्यासंदर्भात संबंधित शासकीय कार्यालयांना लेखी पत्र पाठवून आवाहन केले होते. त्यानंतर नोटिशीव्दारे पाणीपुरवठा खंडीत करण्याचा इशाराही दिला होता. विशेष म्हणजे जल अभियंता नारायण भोसले यांनी स्वतः जातीने संबंधित शासकीय कार्यालयांच्या विभाग प्रमुखांची समक्ष भेट घेऊन थकीत रक्कम भरणेबाबत विनंती केली होती. तरीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पाणी कनेक्शन खंडित करण्याची कारवाई सुरु करण्यात आली.
बुधवारी केंद्र सरकारच्या अख्यारित असलेल्या रेल्वे विभागासह राज्य सरकारच्या समाज कल्याण आणि वन विभागाचे विभागीय कार्यालयांवर कारवाई करण्यात आली. 2 कोटी 5 लाख 53हजार 188रूपये थकबाकी असणाऱया रेल्वेची तब्बल चार कनेक्शन तोडण्यात आली. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व जल अभियंता नारायण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. कारवाईमध्ये वसुली पथक प्रमुख मोहन जाधव, मिटर रिडर रमेश मगदूम, फिटर तानाजी माजगांवकर, वसंत ढेरे यांनी भाग घेतला.
पाणीपट्टी थकीत असणारी शासकीय कार्यालये : कंसात थकबाकीची रक्कम
सी.पी.आर.कार्यालय (8 कोटी 42 लाख 2हजार 227 रूपये), रेल्वे विभाग (2 कोटी 5 लाख 53हजार 188रूपये), पाटबंधारे, वारणा विभाग (98 लाख 59 हजार 431 रूपये), सार्व.बांधकाम कार्यालय (71 लाख 77हजार 461 रूपये), शिवाजी विद्यापीठ कार्यालय (66 लाख 38 हजार 696 रूपये), पाटबंधारे पंचगंगा (63 लाख 5 हजार 933 रूपये), जिल्हाधिकारी कार्यालय (24 लाख 89 हजार 81 रूपये), सी.पी.आर.अधिष्ठाता (20 लाख 23हजार 937 रूपये), जिल्हा परिषद कार्यालय (18 लाख 53 हजार 312 रूपये), टेलिफोन विभाग (16 लाख 17 हजार 361 रूपये). 12 ग्रामपंचायती (6कोटी 94 लाख 64हजार 927 रूपये), या शासकीय कार्यालये व अन्य शासकीय कार्यालयाकडील सुमारे 21 कोटी 4 लाख रूपयांची थकबाकी आहे.
पाणीपट्टी वसुली मोहीम सुरु राहणार आहे. त्यामुळे सर्व शासकीय व खासगी थकबाकीदारांनी आपली थकीत पाणी बिलाची रक्कम मुदतीत भरुन पाणी कनेक्शन बंद करण्याची कारवाई टाळावी. –नारायण भोसले, जलअभियंता, शहर पाणी पुरवठा विभाग, कोमनपा