वनविभाग, पोलीस, अग्निशमन दलाकडून शोध मोहिम : नागरिक भितीच्या छायेखाली
प्रतिनिधी/कोल्हापूर
लक्षतीर्थ वसाहत, सुतारमळा परिसराशेजारील आयडीएल कॉलनी येथे शुक्रवारी पहाटे तीन गव्यांचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. पहाटे फिरायला आलेल्या नागरिकांनी या गव्यांचा केलेला व्हिडीओ दिवसभर व्हायरल झाल्याने व नागरिकांकडून आलेल्या तक्रारीनंतर वनविभाग, पोलीस व अग्निशमन दलाने या परिसरात शोध मोहिम सुरु केली. रात्री उशिरापर्यंत ही मोहिम सुरु होती. सुरक्षिततेच्या कारणास्तव उत्तरेश्वर ते शिंगणापूर व हणमंतवाडी ते शिंगणापूर हे मार्ग बॅरेकेट्स लावून रहदारीस बंद करण्यात आले.
याबाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी की, शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास सुतारमळा लगतच्या आयडीएल कॉलनी येथे फिरायला आलेल्या नागरिकांना तीन गवे फिरत असल्याचे दिसले. यातील काही जणांनी याचे मोबाईलवरुन व्हिडीओ ही घेतले. दिवसभर हे व्हिडीओ व्हायरल झाले. यामुळे सुतारमळा, लक्षतीर्थ वसाहत, बलराम कॉलनी, उत्तरेश्वर पेठ परिसरातील नागरिक भितीच्या छायेखाली आहेत. नागरिकांनी वनविभाग व अग्निशमन दलाला याची माहिती दिली. त्यानुसार तात्काळ वनविभागाच्या 15 जणांच्या पथकासह अग्निशमन दलाचे जवान व पोलीस परिसरात दाखल झाले. त्यांनी सकाळपासून शोध मोहिमेला सुरुवात केली. परंतु या गव्याचे दर्शन झाले नाही. रात्री उशिरापर्यंत ही शोध मोहिम सुरु राहीली. हे गवे या परिसरातच थांबून असल्याचा अंदाज वनविभागाकडून वर्तविण्यात आला. सुरक्षिततेच्या कारणास्तव उत्तरेश्वर ते शिंगणापूर व हणमंतवाडी ते शिंगणापूर हे मार्ग बॅरेकेट्स लावून रहदारीस बंद करण्यात आले. या परिसरातील नागरिकांनाही सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या. रात्री उत्तरेश्वर पेठ, बलराम कॉलनी परिसरात ठिवठिकाणी नागरिक घोळक्याने थांबून होते.
गवे पन्हाळा, गगनबावड्यातून आल्याची शक्यता
शुक्रवारी पहाटे सुतारमळा परिसरात दर्शन झालेले गवे हे पन्हाळा, कळे, किंवा गगनबावडा या मार्गावरुन आल्याची शक्यता वनविभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
सुतारमळा परिसरातील आयडीएल कॉलनी येथे शुक्रवारी पहाटे नागरिकांना दर्शन झालेले तीन गवे हे याच परिसरात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार पोलीस व अग्निशमन दलाच्या सहकार्याने वनविभागाच्या 15 कर्मचार्यांकडून शोध मोहिम सुरु आहे. ही मोहिम दिवसभर व रात्रीही सुरु राहीली. जोपर्यंत हे गवे सापडत नाही तोपर्यंत ही मोहिम सुरुच राहणार आहे. जेणेकरुन हे गवे आल्या मार्गाने परत जावेत या पध्दतीने नियोजन केले जाणार आहे. -प्रदीप सुतार, वनपाल