– मनपा पथकाकडून मंगल कार्यालयांची तपासणी; 30 हजार 500 रुपये दंड वसूल
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या प्रतिबंध नियमांचे उल्लंघन करत शहरात लग्नसराई धुमधडाक्यात सुरु आहे. पन्नासहून अधिक नागरिकांच्या उपस्थितीत सुरु असलेल्या लग्नसमारंभांवर रविवारी महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने कारवाई केली. 27 मंगल कार्यालयांसह लग्नसोहळा आयोजित करणाऱ्या आयोजकांना दंड ठोठावत 30 हजार 500 रुपये दंड वसुल करण्यात आला.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादृर्भाव वाढू नये यासाठी प्रशासन गतीमान झाले आहे. शहर परिसरात कोरोना प्रतिबंध नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर पुन्हा महापालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. रविवारी महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाकडून शहरातील मंगल कार्यालयांची तपासणी करण्यात आली. यामध्ये कार्यालयामध्ये 50च्या वर नागरिकांची उपस्थिती असणाऱया समारंभांवर दंडात्मक कारवाई झाली. फुलेवाडी, आपटेनगर, कळंबा, सानेगुरुजी, क्रशर चौक, नाळे कॉलनी, बेलबाग, कसबा बावडा, ताराबाई पार्क, कावळा नाका, रेल्वे गुड्स आदी परिसरातील मंगल कार्यालयांवर कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, उपमुख्य अधिकारी तानाजी कवाळे, स्थानक अधिकारी रणजीत भिसे आदी उपस्थित होते.
विनामास्क फिरणाऱयांवरही वॉच
शहरात विनामास्क फिरणाऱयांवरही महापालिका प्रशासनाने वॉच ठेवला आहे. रविवारी भवानी मंडप येथे विनामास्क येणाऱया पर्यटकांवर प्रशासनाने कारवाई केली. तसेच विनामास्क फिरणाऱया स्थानिक नागरिकांवरही कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक, व्यापारी, फेरवाले यांनी कोरोना प्रतिबंध नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.