लॉकडाऊनने आठवडी बाजार बंद, भाजीपाला शेतातच पडून
सागल लोहार / व्हनाळी
कागल तालुक्यातील जनतेला कोरोना संसर्गाच्या भीतीने घराबाहेर पडणे अशक्य झाल्याने शेतकरी वर्गासह मजुरांवरही आर्थिक संकट कोसळले आहे. गर्दीला आळा घालण्यासाठी घाऊक बाजारपेठा व तालुक्यातील आठवडी बाजार बंद केल्यामुळे पिकवलेला भाजीपाला विकायचा कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. लॉकडाऊनने भाजीपाल्याचे भाव कमी झाल्याने भाजीपाला फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
कागल तालुक्यात जनावारांचे गोठे शेतीबरोबर भाजीपाल्याचेही पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. टोमॅटो, मिरची, कारली, वांगी, काकडी,दोडके विविध पिके शेतकरी घेतात. भाजीपाल्याला चांगला भाव मिळेल यासाठी शेतकऱ्यांनी उसनवार करत भाजीपाला लागवड केली. मात्र यावर्षी शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा झाला नाही. सलग दोन वर्षे कोरोना, महापुरामुळे शेतीचे फार नुकसान झाले. यावर्षी पूर्ण शेती तोट्यात आल्याने भाजी पिकातून काही हाती येईल या आशेवर शेतकरी वर्गाने मोठा खर्च करून भाजीपाल्याची लागवड केली होती.
संचारबंदी सुरू असताना घराच्या बाहेर पडणे अशक्य झाल्याने शेतावर जाणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागात ७० ते ७५ टक्के शेतकऱ्यांना कोरोनाबंदीचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. एकीकडे वीजपुरवठा रात्रीच्या वेळी सुरू आहे, तर दुसरीकडे शेतीची कामे लांबणीवर जात असल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बी-बियाणे, खते, औषधे व मजुरी महागली आहे.
यावर्षी ढगाळ हवामानामुळे शेतीच्या खर्चात दुप्पटीने वाढ झाली आहे. कागल तालुक्यातील साके येथील शेतकरी सुर्याजी पाटील या शेतकऱ्यांने रचना या जातीच्या दोडक्याची लागवड १० गुंठे क्षेत्रात केली आहे. त्यांना दिड महिन्यानंतर उत्पन्न मिळण्यास सुरूवात झाली आहे त्यातून दररोज ४० ते ५० किलो माल निघतो. बाजारात मागणी नसल्याने ८० रूपये किलो जाणारा दोडका ३० ते ४० रूपये किलो इतक्या कमी दराने व्यापाऱ्यांना द्यावा लागत आहे. एकेदिवशी तेही बंद झाल्यास रस्त्यावर भाजीपाला फेकण्याशिवाय पर्यायच नसल्याने लाखो रूपये खर्ची करून त्यांना सगल दुसऱ्या वर्षीही कोरोनाच्या महामारीमुळे तोटा सहन करावा लागत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलत घाऊक बाजारपेठा व परिसरातील छोटे-मोठे आठवडी बाजारही बंद केल्याने आता हातात आलेल्या भाजीपाला पिकांचे करायचे काय, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आवासुनउभा राहिला आहे. त्यामुळे आता शेतीला कोरोनाचा फटका मोठा फटका बसला आहे. जागतिक स्तरावर कोरोनाचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सार्वजनिक ठिकाणासह आठवडी बाजारावर बंदी आणली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काढणीवर आलेला भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान होत आहे. भाजीपाला पीक कमी वेळात होणार असल्यामुळे तो वेळेवर काढून वेळेवर मार्केटमध्ये पोहोचण्याची धडपड शेतकऱ्यांमध्ये असते. मात्र शहरातील आठवडी बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. एकतर संचारबंदीमुळे घराबाहेर पडणे बंद आहे. त्यामुळे रोजगार मिळेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
माझ्या शेतात कारली, दोडका, पीक लावलेलं आहे. आज ते पूर्ण पीक कोरोनाच्या महामारीने विक्री न होत असल्यामुळे शेतात पडून आहे. कोरोनाची महामारी पाहता दोन्ही वर्षांचा हंगाम पूर्ण वाया गेला आहे. त्यामुळे मजूरांचा खर्च, औषधे, खते यांचा व मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नाचा ताळेबंद जुळत नसल्याने शेती पडरवडत नाही त्यामुळे शासनाने आम्हा शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत द्यावी.
– सुर्याजी संभाजी पाटील शेतकरी, साके