कृष्णात चौगले / कोल्हापूर
गेल्या आठ ते दहा दिवसांमध्ये जिह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्नांची पराकाष्टा सुरु असूनदेखील दररोज पन्नास ते साठहून अधिक बाधितांची भर पडत आहे. समूह संसर्गजन्य स्थिती निर्माण झाल्यामुळे ग्रामीण भागाच्या कानाकोपऱयातही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी जिह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन पातळीवर गांभिर्याने चर्चा सुरु आहे. पण लोकप्रतिनिधींमध्येच दोन मतप्रवाह असल्यामुळे प्रशासनाची कोंडी झाली आहे.
देशभरात लागू केलेले लॉकडाऊन मे महिन्याच्या उत्तरार्धात शिथिल केल्यानंतर बाहेरील जिल्हा आणि राज्यातील लोकांना ऑनलाईन पासद्वारे जिह्यात येण्यास परवानगी दिली. यावेळी कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे आणि मुंबईसारख्या ठिकाणाहून हजारो लोक कोल्हापूरात आले. तेंव्हापासूनच जिह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढली. मे आणि जून महिन्याचा आढावा घेता या कालावधीत दररोज सुमारे 15 ते 25 रूग्णांची भर पडत होती. हा चढता आलेख जूनअखेर थोडा घसरला. जुलैच्या पहिल्या आठवडय़ापासून पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला असून सुमारे 400 रुग्णांची भर पडली आहे. जिह्यातील अनेक गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने मास्क आणि सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन केले आहे. तर मास्कशिवाय फिरणाऱया नागरिकांकडून दंडाचीही आकारणी केली जात आहे. लक्षणे दिसणाऱया प्रत्येक नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. तरीही संसर्गाचे प्रमाण कमी होत नसून वाढतच चालले आहे.
या पार्श्वभूमीवर कोविड-19 विषाणूंची संसर्ग साखळी तोडण्यासाठी कोल्हापूर जिह्यात पुन्हा 10 ते 15 दिवस लॉकडाऊन करण्याबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनपातळीवर विचारविनिमय सुरु आहेत. पण यामध्ये कोणत्याही परिस्थितीत कडक लॉकडाऊन करावे असा एक मतप्रवाह आहे. तर लॉकडाऊन केल्यास पुन्हा सर्वसामान्य जनतेची, हातावर पोट असणाऱया लोकांची अर्थिक फरपट होईल. लॉकडाऊन करण्याऐवजी लोकांनी स्वतःची आणि आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी या मतावर काही लोकप्रतिनिधी ठाम आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱयांसह इतर जबाबदार अधिकाऱयांनी मात्र मौन बाळगले आहे. कोल्हापूरातील तीन मंत्र्यांमध्ये लॉकडाऊनबाबत मतमतांतर आहे. खासदार संजय मंडलिक, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यासह काही आमदारांकडून लॉकडाऊन करण्याची मागणी केली जात आहे. तर काही आमदारांमध्ये लॉकडाऊन नको असा सूर आहे.
नागरिकांमध्येही मतभिन्नता
लॉकडाऊन केल्यास पुन्हा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार असल्यामुळे लॉकडाऊन नको अशी समाजातील एका वर्गाची मागणी आहे. तर संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हवेच असा दुसरा एक मतप्रवाह आहे. नागरिकांमध्येही मतभिन्नता पहावयास मिळत आहे.
आज आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक
जिह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या, उपलब्ध आरोग्य यंत्रणा, भविष्यात वाढणारे प्रमाण आणि कराव्या लागणाऱया उपाययोजना याबाबत पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी मंगळवारी होणारी बैठक रद्द झाली. आज (15 जुलै) ही बैठक होणार असून यामध्ये कोल्हापूरात लॉकडाऊन करायचे की नाही ? यावर शिक्कामोर्तब होणार आहे.