सतत होणाऱ्या हल्यामुळे मेंढपाळ अडचणीत
प्रतिनिधी / कागल
कागल शहराजवळ शर्मिक वसाहत रोडवर कांदेकर मळा येथील निखिल कृष्णात पिष्टे,यांच्या शेतात म्हाळू कृष्णात गोरडे, आनंदा सिद्धू रानगे यांचा मेंढरांचा कळप गट नंबर २६३/३ येथे काही दिवसापासून खतासाठी बसायला आहे. रात्री साडेसहा पावणे सातच्या दरम्यान अचानक या मेंढरांच्या कळपावर तरसदृश्य वन्य प्राण्यांनी हल्ला केला या हल्ल्यात म्हाळु कृष्णात गोरडे यांची पाच मेंढर व पाच बोकड अशी एकूण दहा बकरी ठार झाली आहेत. तर एक मेंढी एक शेळी बेपत्ता आहे.
या घटनेत मेंढपाळ यांचे दिड लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. सदर हल्ल्याचे माहिती मेंढपाळ म्हाळू कृष्णात गोरडे यांनी यशवंत क्रांती संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमोडे यांना तात्काळ फोन वरून कळवली. घटनेचे गांभीर्य ओळखून संजय वाघमोडे यांनी सदर घटनेची माहिती पशुसंवर्धन विभाग व वन विभाग यांना कळवले. स्वतःही संजय वाघमोडे हे वन विभागाचे अधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी यांच्याबरोबर तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेचा रीतसर अधिकाऱ्यांकडून पंचनामा करण्यात आला.
यावेळी संजय वाघमोडे घटनेबाबत बोलताना म्हणाले, वन्यप्राण्यांचे हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे व शासनाकडून मिळणारी भरपाई अगदीच कमी मिळत आहे सध्या कोरोना महामारी, मेंढपाळांच्यावर होणारे हल्ले, मेंढरं चोरी व शेतकऱ्यांच्या कडून होणारी अडवणूक आणि वन्यप्राण्यांचे हल्ले, यामुळे मेंढपाळ अडचणीत सापडला आहे . वन्य प्राण्यांनी एखादी बकरी पूर्णता खाऊन टाकले किंवा आपल्याबरोबर घेऊन गेले तर त्यांचे अवशेषही मिळत नाहीत. अशावेळी पशुसंवर्धन अधिकारी व वन विभाग अशा प्राण्यांची नोंद नुकसान भरपाईसाठी धरत नसल्याने नुकसान भरपाई मिळत नाही तरी शासनाने कागदी घोडे नाचवण्यापेक्षा काही सवलत देऊन मेंढपाळांना सर्व प्राण्यांची भरपाई देण्यात यावे तसेच मिळणारी भरपाई खूपच कमी असल्याने ती वाढवून देण्याची मागणी केली.
ही घटना समजताच यशवंत क्रांती संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. घनवट, वनपाल विजय पाटील, वनरक्षक रुपेश मुलानी, वनसेवक बाबासो जगदाळे, गजानन मगदूम, संदीप हजारे यांचेसह घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला.