म्हासुर्ली – चौधरवाडी बंधाऱ्याच्या भराव रस्त्यास भगदाड पडल्याने वाहतूक बंद, बंधारा बनला मृत्यूचा सापळा, नवीन पुलाची मागणी, प्रशासनाचे दुर्लक्ष, जनतेतून संताप.
म्हासुर्ली / वार्ताहर
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीसह प्रचंड महापुरामुळे निपाणी – परिते ते गगनबावडा या नव्याने तयार झालेल्या राज्य मार्गावरील धामणी नदीवरील म्हासुर्ली (ता.राधानगरी ) ते चौधरवाडी (ता. गगनबावडा) दरम्यान असलेल्या धामणी नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याच्या पश्चिमेकडील भरावा रस्ता वाहून गेल्याने मोठी भगदाडे पडून खड्डे पडले आहेत. परिणामी गगनबावडा – कोकणकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद पडली आहे. तर धाडसाने या बंधाऱ्यावरुन काही मोटरसायकलस्वार जीव धोकादायक घालून प्रवास करत असल्याने सदर बंधारा मृत्युचा सापळा बनला आहे.
म्हासुर्ली (ता.राधानगरी) ते चौधरवाडी (ता.गगनबावडा) गावांच्या दरम्यान असणाऱ्या धामणी नदीवर शासनाच्या पाटबंधारे विभागाने परिसरातील शेतीला पाणी पुरवठा व्हावा यासाठी सुमारे १२-१३ वर्षापूर्वी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधला आहे.
मात्र या बंधाऱ्यात पाणीसाठा करण्या बरोबरच बंधाऱ्यावरून धामणी खोऱ्यासह कोकण व गगनबावड्याकडे मोठ्या प्रमाणात वाहनातून प्रवासी वाहतूक होत असल्याने सदर बंधाऱ्यास महत्व प्राप्त झाले आहे. मात्र सदर बंधाऱ्याकडे शासनाच्या सर्वच विभागाचे दुर्लक्ष झाल्याने बंधाऱ्याची दुरावस्था होत चालली आहे. पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे बंधाऱ्याच्या देखभालीकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. परिणामी पूर्व व पश्चिमेकडील भराव खचत चालला होता. मात्र गत वर्षीच्या व नुकत्याच ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे पश्चिमेकडील भरावच वाहून गेल्याने शेतीसह बंधाऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.
महापुरामुळे प्रचंड वेगाच्या पाण्यामुळे भराव रस्ता प्रवाहाबरोबर वाहून गेल्या असून मोठमोठी भगदाडे पडली आहेत. त्यामुळे बंधाऱ्यावरुन होणारी सर्व वाहतूक बंद पडली असून धुंदवडे व गगनबावडा परिसरातील जनतेला म्हासुर्ली परिसरात येण्यासाठी सुमारे आठ किलोमीटरचा वळसा घालून गवशी बंधाऱ्यावरून यावे लागत आहे. तसेच काही जण मोटरसायकस्वार धोका पत्करुन प्रवास करत असल्याने बंधारा मृत्युचा सापळा बनला आहे. तसेच बाजूच्या शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात धूप झाल्याने शेताचे प्रचंड नुकसान झाले आहे. तरी पण गेड्यांच्या कातडीचे प्रशासन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे.
महापुराच्या पाण्याबरोबर मोठे वेळूचे बेट व लाकडे येऊन अडकली आहेत. परिणामी बंधाऱ्यास धोका निर्माण झाला आहे.अशा स्थितीत ही काही वाहनधारक जीव धोक्यात घालून प्रवासातील शॉर्टकट शोधत बंधाऱ्यावरून धोकादायक प्रवास करत आहेत. मात्र वाहून गेलेला रस्ता व पडलेली भगदाडे भरून घेण्यास पाटबंधारे विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असून रस्ता व बंधारा पाहणीसाठी या दोन विभागाचे कोणीच अधिकारी इकडे फिरकले नसल्याचा आरोप जनतेतून होत आहे. परिणामी प्रवासी जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तरी लोकप्रतिनिधी व शासनस्तरावरील अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रस्ता वाहतूकीसाठी तयार करावा अशी मागणी होत आहे.