यंदाही मुलींचीच बाजी, -राज्यात कोल्हापूर चौथ्या स्थानावर
प्रतिनिधी / कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडून बारावीचा निकाल मंगळवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यामध्ये राज्याचा 99.63 टक्के तर कोल्हापूर विभागाचा निकाल 99.67 टक्के निकाल लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न घेता राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार बारावीचा निकाल तयार करण्यात आला आहे. त्यामुळे निकालात फुगवटा झाला असून 7.25 टक्केनी वाढ झाली आहे. मुलांच्या तुलनेत 0.18 टक्के जास्त मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण असल्याने यंदाही मुलींनीच बारावीच्या निकालात बाजी मारली आहे. कोल्हापूर विभागात सातारा प्रथम, सांगली व्दितीय व कोल्हापूर तृतीय क्रमांकावर आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न घेता दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत गुणांच्या आधारे गुणदान करण्यात आले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा 7.25 टक्केंनी वाढ झाल्याने निकालातील फुगवटा दिसून येतो. कोल्हापूर विभागातून बारावीच्या परीक्षेला 822 कनिष्ठ महाविद्यालयांतील 1 लाख 17 हजार 705 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी 1 लाख 17 हजार 317 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 388 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये केआयटीच्या 88 विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यांची परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेतली जाणार आहे. जे विद्यार्थी मिळालेल्या गुणांवर समाधानी नसतील त्यांची शासन निर्णयानुसार परीक्षा घेतली जाणार आहे. संबंधीत निकालासंदर्भात विद्यार्थ्यांची तक्रार असल्यास त्यांनी कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हापूर विभागीय मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे.
बारावीच्या परीक्षेत गतवर्षी कोल्हापूर विभाग दुसऱया स्थानावर होते. तर यंदा चवथ्या स्थानावर आहे. राज्यासह कोल्हापूर विभागातही मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. मुलांची उत्तीर्णतेची संख्या 63 हजार 199 असून त्याचे प्रमाण 99.58 टक्के आहे. तर मुलींच्या उत्तीर्णतेची संख्या 54 हजार 244 असून त्याचे प्रमाण 99.76 टक्के आहे. म्हणजेच मुलींच्या उर्त्तीर्णतेचे प्रमाण विभागात मुलांच्या तुलनेत 0.18 इतके अधिक आहे. गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती मिळणे, पुनर्मूल्यांकन या सुविधा यंदाच्या परीक्षेसाठी उपलब्ध नाहीत. तक्रार निवारणासंदर्भात विभागीय मंडळांच्या सहसचिवांची नेमणूक केली असून, तक्रारीसंदर्भात संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
खेळाडू एनसीसी, स्काऊट, गाईड, दिव्यांग
बारावीच्या परीक्षेला बसलेल्या खेळाडू, एन. सी. सी., स्काऊट, गाईड यांना अकावीच्या धर्तीवर 100 टक्के गुणांच्या अधीन राहून सवलतीचे गुण देण्यात आले आहेत. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित नियमानुसार गुण देण्यात आले आहेत.
कोल्हापूर विभागाचा निकाल (नियमित विद्यार्थी)
जिल्हा | कनिष्ठ महाविद्यालय | मूल्यांकन प्राप्त विद्यार्थी | उत्तीर्ण विद्यार्थी | टक्केवारी |
सातारा | 246 | 35619 | 35589 | 99.91 |
सांगली | 265 | 32111 | 31987 | 99.61 |
कोल्हापूर | 311 | 49975 | 49741 | 99.53 |
एकूण | 822 | 117705 | 117317 | 99.67 |