माध्यमिक व उच्च विभागीय शिक्षण मंडळ सचिव देविदास कुलाळ यांची माहिती
कोल्हापूर, सांगली, सातारा तिन्ही जिल्ह्यातील 1 लाख 39 हजार 518 विद्यार्थ्यांच्या निकालाची हार्ड कॉपी शिक्षण मंडळाकडे
अनावधानाने राहिलेल्या चुका दुरूस्तीची लवकरच तारीख जाहीर करणार
प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्य शासनाने ठरवून दिलेल्या सूत्रानुसार राज्यभर दहावीचा निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. शासनाने दिलेल्या वेळेत माध्यमिक व उच्च माध्यमिक कोल्हापूर शिक्षण मंडळाने 1 लाख 39 हजार 518 दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची सॉफ्ट कॉपी शासनाच्या संगणक प्रणालीत भरून विभागीय शिक्षण मंडळाकडे हार्ड कॉपी सादर केली आहे. परंतू राज्य शिक्षण मंडळाच्या नियमानुसार दहावीच्या निकालात अनावधानाने राहिलेल्या चुका किंवा त्रृटी दुरूस्तीसाठीची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करून नववी आणि दहावीच्या अंतर्गत लेखी मूल्यमापन, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षेवर आधारीत गुणांकण करून दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले आहे. कोल्हापूर विभागातील सर्व शाळांनी निकाल समितीच्या मान्यतेने आपआपल्या शाळांचे निकाल तयार करून सॉफ्ट कॉपी शासनाच्या अधिकृत संगणक प्रणालीत भरली आहे. या निकालाची हार्ड कॉपी कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाकडे सादर केली आहे. परंतू अनावधानाने विहीत वेळेत किंवा विद्यार्थीनिहाय गुण भरून निश्चित केले नाहीत. गुण निश्चित केले परंतू त्रृटी राहिलेल्या आहेत. एखाद्या विषयाचे, विभागाचे गुण भरलेले नाहीत. पुनर्परीक्षार्थींच्याबाबतीत विषयाची श्रेणी दर्शवताना सध्याच्या तीन श्रेणी विषयांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे जुने श्रेणी विषय असल्यास चवथी, पहिली, दुसरी व तिसरी श्रेणी दर्शवण्यात आली आहे. उशिराने अवेदनपत्र भरल्यामुळे बैठक क्रमांक प्राप्त झाला नाही. त्यामुळे संगणक प्रणालीत विद्यार्थ्यांचे गुण, श्रेणी भरता आलेली नाही. यासह अन्य चुका राहिल्या असतील तर त्या दुरूस्त करण्यासाठी लवकरच तारखा जाहीर करण्यात येणार आहेत. कोल्हापूर शिक्षण विभागाने जिल्हानिहाय तारखा जाहीर केल्यानंतर संबंधीत शाळांनी कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळात येवून दुरूस्ती करावयाची आहे.
दहावीचा निकाल पूर्ण करणारा कोल्हापूर विभाग राज्यात प्रथम
माध्यमिक व उच्च माध्यमिक कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाने राज्यात प्रथम दहावीचा निकाल पूर्ण केला आहे. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने कोल्हापूर विभागाचे कौतुक होत आहे. कोल्हापूर विभागातील किरकोळ चुकांची दुरूस्तीही लवकरच केली जाईल.