शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
उजळाईवाडीतील विमानतळ विस्तारीकरणामुळे परिसरातील 6 गावांतील 750 एकरांतील लोक विस्थापित होणार आहेत. या भुमीपुत्रांना रोजगार द्या, त्यांचे पुनर्वसन करा, अशी मागणी शिवसेनेने गुरूवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली.
शिवसेनेने जिल्हाधिकाऱयांना दिलेल्या निवेदनात विमानतळ विस्तारीकरणासाठी गडमुडशिंगी, उचगाव, सरनोबतवाडी, नेर्ली, तामगाव, गोकुळ शिरगाव परिसरातील 750 एकर जमीन संपादीत करण्यात येत आहे. त्यामुळे विस्थापित होणाऱया भुमीपुत्रांना त्यांच्या गुणवत्तेनुसार नोकरी, रोजगार मिळावा, गडमुडशिंगीतील 65 एकर जमीन संपादीत झाली आहे.
तेथील नागरिकांना बाजारभावाच्या पाचपट भरपाई मिळावी, लक्ष्मीवाडी येथील नागरीकांचे पुनर्वसन करावे, प्रकल्पग्रस्तांना विमानतळाच्या ठिकाणी नोकऱया द्याव्यात, गडमुडशिंगीतील तरूणांना विशेष बाब म्हणून रोजगारात राखीव कोटा मिळावा, या मागण्या केल्या आहेत. जिल्हाधिकारी देसाई यांना निवेदन देताना जिल्हाप्रमुख संजय पवार, पोपट दांगट, विनोद खोत, विराज पाटील, अभिजित बुकशेट, प्रवीण पालव शिवसैनिक उपस्थित होते.