शासकीय अधिकारी गायब, तलाठ्यांना फोन उचलायला ही वेळ नाही
दहा गवत गंज्या जळाल्या : सुमारे तीन लाखाचे नुकसान
वार्ताहर / व्हनाळी
व्हनाळी तालुका कागल येथील गवत गंजीना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत दहा गवत गंज्या जळाल्या यामध्ये सहा शेतकऱ्यांचे सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले आहे.
व्हनाळी गावच्या दक्षिणेला असलेल्या अंबाबाई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत दंडवते वसाहत परिसरात जनावरांच्या वाळलेल्या चाऱ्याची उपलब्धता म्हणून शेतकऱ्यांनी गवत पिंजराच्या गंज्या घातल्या होत्या. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास या गवत गंजींना अचानक आग लागली. शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांनी आग लागल्याचे पाहताच आरडाओरडा केला. शिवाय आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आगीने रुद्ररूप धारण केल्याने आग विझवण्या यश आले नाही. त्यानंतर कागल नगरपालिकेच्या अग्निशामक याविषयी माहिती देण्यात आली परंतु अग्निशामक दलाच्या येण्यापुर्वीच या गवताच्या गंजा पूर्णपणे जळालेल्या होत्या. गंजीतील पिंजर गवत जळाल्यामुळे जनावरांच्या पावसाळ्यात उपलब्ध असणाऱ्या वाळल्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
यामध्ये निवृत्ती कृष्णा दंडवते, सुरेश शिवराम दंडवते, शशिकांत शिवराम दंडवते, आनंदा शिवराम दंडवते, रवींद्र बळवंत पाटील, बाबासो शामराव आगळे आदी शेतकऱ्यांच्या गवत गंजी जळाल्याने त्यांचे सुमारे 3 लाखाचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. झाल्यानं नुकसानीचा शासकीय पंचनामा होऊन मदत मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतून होत आहे.
शासकीय यंत्रणाच ढिसाळ व्हनाळी येथे झालेल्या या गवत गंजीच्या जळीताची पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करण्याच्या अपेक्षेने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तलाठी दिपा हुंबे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही व कोणीही शासकीय अधिकारी येथे पोहोचले नाहीत त्यामुळे शासकीय यंत्रणा कुचकामी असल्याचे नागरिकांतून चर्चा सुरू आहे. |