सांगरूळ / प्रतिनिधी
कोल्हापूर व मुंबई विभागातील उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्या यांना मंत्रिमंडळ बैठकीत अनुदान देण्याबाबत निर्णय घेऊन यावर राज्यपाल यांची मंजुरी घेऊन निधी देण्याची व्यवस्था करू यासाठी पुढील अधिवेशनाची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांना दिले . कोल्हापूर व मुंबई विभागातील शाळांना अनुदान वितरण करण्यासाठी आमदार जयंत आसगावकर यांनी शिष्टमंडळासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले व शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी बोलताना आमदार जयंत आसगावकर यांनी कोल्हापूर व मुबई विभागातील उच्च माध्यमिक शाळांना त्यांची कोणतीही चूक नसताना अनुदानापासून वंचित रहावे लागत आहे. शासनाच्या अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे या शाळा अनुदानापासून वंचित राहत आहेत. गेली पंधरा वर्षांपासून अधिक काळ काम करणारा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आज अनुदानापासून वंचित राहत असेल तर ही दुर्दैवी बाब आहे, त्यामुळे या शाळांना अनुदान मिळणे आवश्यक असून या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपल्या माध्यमातून न्याय द्यावा अशी विनंती आमदार आसगांवकर यांनी केली. याबाबत मंत्री स्तरावर निर्णय घेऊन न्याय देऊ असे ठोस आश्वासन नाना पटोले यांनी यावेळी दिले.
त्यानंतर मा शिक्षण मंत्री महोदया ना.वर्षा गायकवाड यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली त्यांनीही या शाळांच्या अनुदानाबाबत चर्चा झाली असून लवकरात लवकर याबाबत विचार करीत आसून सर्व मंत्रीमहोदय याबाबत सकारात्मक आहेत, असे सांगितले. यावेळी खंडेराव जगदाळे, अजित शिंदे , सय्यद शेख , लक्ष्मण कांबळे , रावसाहेब पानारी प्रेमकुमार बिंदगे,सुनील पानसरे, अमोल पाटील हे उपस्थित होते .