प्रतिनिधी / कोल्हापूर
महापुराच्या पाण्यामुळे शहरातील पूरबाधित भागातील बंद पडलेली एटीएम मशिन तत्काळ सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे उपशहर प्रमुख शशिकांत बिडकर यांनी केली आहे. जुलै महिन्यात आलेल्या महापुरानंतर शहरातील अनेक भागात पाणी शिरले होते. या पूरबाधित भागात अनेक हॉस्टिपलबरोबर बँका आहेत. काही बँकांची एटीएमची मशिनही आहेत.
महापुराचे पाणी शिरल्याने कसबा बावडा, लाईन बझार, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी आदी भागातील सुमारे 45 हून अधिक एटीएम मशिन बंद पडली. त्यातील काही नादुरूस्तही झाली. त्यानंतर अद्याप बहुतांश एटीएम मशिन बंद आहेत. त्याचा फटका बँकेच्या ग्राहकांना बसत आहे. त्यांची गैरसोय होत आहे. ती टाळण्यासाठी बंद स्थिती असलेली एटीएम मशिन तातडीने दुरूस्त करून सुरू करावीत, असेही बिडकर यांनी म्हटले आहे.