भूवापर टेंडरमध्ये महापौरांचा हस्तक्षेप
नियम, अटींमध्ये करायला लावला बदल
भ्रष्टाचार झाल्याचा भाजप, ताराराणी आघाडीचा आरोप
प्रतिनिधी / कोल्हापूर
शहर विकास आरखडय़ाची निविदा प्रसिद्ध होण्याअधीच वादाच्या भोवर्यात सापडली आहे. भूवापर टेंडरमध्ये महापौरांनी हस्तक्षेप करत प्रशासनाला नियम व अटींमध्ये बदल करायला लावले आहेत. टेंडरमधील नियम व अटींमध्ये केवळ प्रशासनच बदल करु शकते. मात्र महापौरांनी पदाचा गैरवापर करत टेंडर प्रक्रीयेत हस्तक्षेप केला आहे. सुमारे सात कोटींचे टेंडर मर्जीतील कंपन्यांना देण्यासाठी बदल केले असून यामध्ये मोठयाप्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप, ताराराणी आघाडीच्या पदाधिकाऱयांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
भाजप गटनेते अजित ठाणेकर म्हणाले, नविन विकास योजनेसाठी पायाभूत नकाशा आणि विद्यमान भूवापर नकाशा करण्यासाठी तज्ञ संस्थेची नेमणूक करण्याचे काम फेब्रुवारी 2017मध्ये सुरु झाले. 10 नोव्हेंबर 2017महासभेमध्ये या कामासाठी टेंडर काढण्यास मंजुरी दिली. मात्र या टेंडर प्रक्रीयेमध्ये पहिल्यापासूनच घोळ दिसून येत आहे.
टेंडरसाठी 6 ते 7 कोटी इतका अंदाजित खर्च धरण्यात आला. मुख्य लेखापाल यांनी हा खर्च कोणत्या अंदाजावर धरला आहे, असा प्रश्न नगरचना विभागाला विचारला. मात्र हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच असून टेंडर काढण्यास मंजुरी देण्यात आली. 15 मार्च 2018 मध्ये प्रीबीड मिटींग घेण्यात आली. मिटींगमधील कंपन्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दांवर नगररचना विभागाने पात्रता निकषात काही बदल सुचविले होते. मात्र तत्कालीन आयुक्तांनी कोणतेही बदल न करता टेंडर प्रक्रीया राबविण्याचे आदेश दिले. सुमारे सव्वावर्ष ही प्रक्रीया सुरु होती. मात्र आखेर हे टेंडर रद्द करण्यात आले.
यानंतर वर्षभरानंतर टेंडरमधील त्रुटी दूर करण्याचा ठराव नोव्हेंबर 2018 मध्य़े करण्यात आला. मंजुरीनंतर दिड वर्षांनतंर नगर रचना विभागाने पुन्हा टेंडर प्रक्रीया राबविण्यास हालचाली सुरु केल्या. 3 मार्च 2020मध्ये टेंडर प्रक्रीयेला आयुक्तांनी मंजुरी दिली. निविदापूर्व बैठकीत उपस्थित असणार्या 10 कंपन्यांच्या प्रतिनिधींनी निकषात काही बदल सुचविले. मिटींगमध्ये 10 पैकी 7 कंपन्यांनी सुचविलेले बदल न करता एकाच गावाच्या असलेल्या तीन कंपन्यांनी सुचविलेले बदल मान्य केले आहेत. तसेच महापौरांनीही करायला लावलेले बदल हे या तीन कंपन्यांनी सुचविलेल्या बदलाशी मिळते जुळते आहेत. त्यामुळे मर्जीतील कंपन्यांना टेंडर देवून मलिदा लाटण्याचा डाव असल्याचा आरोप ठाणेकर यांनी केला आहे.
ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम म्हणाले, शहर विकास आराखडा टेंडर प्रक्रीयेबाबत आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांची भेट घेवून हि प्रक्रीया चुकीच्या पद्धतीने सुरु असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. तसच हे टेंडर रद्द करुन याची चौकशी करुन नविन टेंडर प्रक्रीया राबविण्याची मागणी केली होती. मात्र आयुक्तांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांच्याबाबतही संशय निर्माण होत आहे, असे कदम यांनी सांगितले.
अन्यथा न्यायालयात जाणार
टेंडरमधील नियम व अटींमध्ये बदल करण्याचा अधिकार महापौरांना नाही. तरीही त्यांनी बदल केले आहेत. महापौरांच्या कुटुंबातील एका सदस्याच्या जवळच्या कंपनीला हे टेंडर देण्यासाठी हा अट्टाहास सुरु आहे. टेंडर प्रकीया पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने सुरु असून टेंडरला तत्काळ स्थगिती देण्यात यावी. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी. स्थगिती देण्यात आली नाही तर याप्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी यांनी पत्रकात परिषदेत दिला.