हातकणंगले तालुका रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेच्या बैठकीत प्रतिपादन
टोप / वार्ताहर
शासनाने अपात्र शिधापत्रिका मोहिम राबवणार आहे. त्यातील जाचक अटी रद्द करण्याची मागणी राज्य संघटनेचे सचिव कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी केली. हातकणंगले तालुका रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने आयोजित तालुक्यातील धान्य दुकानदार संघटनेच्या मेळाव्यात हातकणंगले येथे बोलत होते.
यावेळी बोलताना यादव म्हणाले, शासन शिधापत्रिका शोध मोहीम राबविणार आहे. त्यात असणार्या जाचक अटींमध्ये गॅस, पेन्शनर, शासकीय व निमशासकीय कर्मचारी दूध उत्पादक दोन चाकी व चारचाकी वाहनधारक अशा अटी असल्याने मोठ्या प्रमाणात रेशनकार्ड रद्द होणार असून या शासनाने घातलेल्या अटी पूर्णपणे रद्द करण्यात याव्या अन्यथा आम जनतेबरोबर घेऊन जनआंदोलन उभारण्याचा इशाराही दिला. जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे, जिल्हा उपाध्यक्ष अबू बारगीर, कार्याध्यक्ष दिनकर पाटील तालुकाअध्यक्ष श्रीपतराव पाटील यांनी शासनाने घातलेल्या शिधापत्रिका शोधमोहिम जाचक अटींबाबत जोरदार टिका करत रद्द करावी असे सांगितले.
या मेळाव्यात धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांची नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सदस्यपदी किशोर पाटील (कबनुर), किरण पाटील (लाटवडे), आप्पा एडके (नेज), सृष्टि पाटिल (खोची) निवड झाल्याबद्दल विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.