केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध – ‘मोदी हटाव, किसान बचाव’ चा नारा
प्रतिनिधी / कोल्हापूर
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाविरोधात शिवसेनेतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी ‘मोदी हटाव, किसान बचाव’चा नारा देत केंद्र सरकारचा निषेध केला.
दुपारी साडे बाराच्या सुमारास खानविलकर पेट्रोल पंप येथून मोर्चाला सुरूवात झाली. प्रमुख मार्गावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली. यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. हे कृषी विधेयक रद्द करावे, यासह विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
आंदोलनात जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शिवाजी जाधव, विराज पाटील, शिवाजीराव पाटील, शैलजा पाटील, दत्ताजी टिपूगडे, मंजित माने आदी सहभागी झाले होते.